वकील-पक्षकारांना मिळाला दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे गेल्या महिन्याभरापासून न्यायालयीन कामकाज बंद करण्यात आले होते. केवळ महत्त्वाच्या खटल्यांचे कामकाज सुरू होते. त्यामुळे वकील व पक्षकारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मात्र उच्च न्यायालयाने सोमवार दि. 7 पासून न्यायालयीन कामकाजाला सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायालयांच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच न्यायालयांमध्ये गर्दी दिसून आली.
कोरोनामुळे बरेच निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे काम ठप्प झाले होते. पक्षकारांना प्रवेशद्वारावरच ताटकळत थांबावे लागत होते. वकिलांनाही काम करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे नाराजी व्यक्त झाली होती. मात्र आता कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाज सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने साऱयांनाच दिलासा मिळाला आहे. सोमवारी विविध न्यायालयांमध्ये कामकाज झाले. सकाळी 10 वाजता न्यायालय आवारात मोठी गर्दी होती.