ऑक्सिजनअभावी मृत्यूप्रकरण : राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
प्रतिनिधी / बेंगळूर
चामराजनगर सरकारी जिल्हा इस्पिळात 2 मे रोजी रात्री 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण न्यायालयीन चौकशीसाठी सोपविण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. कोविड नियंत्रण व चिकित्सेसंबंधी दाखल झालेल्या विविध याचिकांवर मंगळवारी मुख्य न्यायाधीश अभय ओक आणि न्या. अरविंद कुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी चामराजनगर जिल्हा इस्पितळात रुग्णांच्या मृत्यूचे वृत्त प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्याविषयी खंडपीठाने कळकळ व्यक्त केली. शिवाय आणखी किती जणांचा मृत्यू झाला आहे?, त्यामागची कारणे कोणती?, असे प्रश्न ऍडव्होकेट जनरलना उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना ऍड. जनरल प्रभुलिंग नावदगी यांनी, रुग्णांचा मृत्यू झाला ही बाब खरी असली तरी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला का, याविषयी अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे दुर्घटनेची कारणे शोधण्यासाठी एका आयएएस अधिकाऱयाची नेमणूक केली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ते अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. या घटनेला जबाबदार असणाऱयांवर कठोर कारवाई करण्यास सरकार तयार आहे, असे स्पष्ट केले.
युक्तीवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण न्यायालयीन चौकशीसाठी सोपविण्यास योग्य आहे. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करा. तसेच प्रकरणासंबंधी अहवाल सादर करा, असा राज्य सरकारला आदेश देऊन सुनावणी लांबणीवर टाकली.
आणखी किती जणांचा मृत्यू व्हावा? चामराजनगरमध्ये ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फैलावर घेतले आहे. कर्नाटकसाठी तुम्ही ऑक्सिजन पुरवठय़ाचे प्रमाण वाढवणार की नाही?, आणखी किती जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू व्हावा?, असे प्रश्न न्यायालयाने केंद्र सरकारला उपस्थित केले. कमी संसर्ग असणाऱया राज्यांना अधिक ऑक्सिजन पुरवठा केला आहात. मात्र, कर्नाटकात ऑक्सिजन नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. चामराजनगर, गुलबर्ग्यातील घटना पाहून तरी तुम्ही निर्णय बदला, असे खडे बोलही न्यायालयाने सुनावले. दरम्यान, केंद्र सरकारचे वकील क्लिस्टन रोजारियो यांनी याविषयी बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत वेळ द्या, अशी विनंती केली.