प्रतिनिधी/ बेळगाव
न्यायालये 1 जूनपासून सुरू होणार आहेत. मात्र, दिवसाला केवळ 10 खटल्यांचे कामकाज चालणार आहे. दोन आठवडे अशा प्रकारे कामकाज होणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कामकाजाची रुपरेषा ठरविली जाणार आहे.
न्यायालयामध्ये न्यायाधीश, वकील व क्लार्क अशा एकूण 20 जणांनाच मुभा राहणार आहे. याच बरोबर न्यायाधीशांनी एक दिवस काम केल्यानंतर दुसऱया दिवशी प्रशासकीय काम पाहावे लागणार आहे. दुसऱया दिवशी दुसरे न्यायाधीश काम पाहणार आहेत. अशाप्रकारे दोन दिवसांतून एकदाच न्यायाधीशांना काम पाहावे लागणार आहे.
न्यायालयामध्ये पक्षकार तसेच इतर कोणालाही परवानगी राहणार नाही. केवळ वकीलच आपले म्हणणे मांडणार आहेत. दोन आठवडय़ांनंतर परिस्थिती पाहून त्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये दहा खटले तर दुपारच्या सत्रामध्ये दहा खटल्यांचे कामकाज पाहण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाज 1 तारखेपासून सुरू राहिले तरी कामकाजावर बरेच निर्बंध राहणार आहेत.