प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे न्यायालयीन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. ऑनलाईन व व्हिडिओच्या माध्यमातून सध्या काम सुरू आहे. बुधवारी न्यायालयाच्या आवारात थांबून काही जणांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपली साक्ष व म्हणणे नोंदविले. यामुळे न्यायालयाच्या आवारात पक्षकारांना थांबून घेऊन वकील व्हिडिओच्या माध्यमातून न्यायालयीन कामकाज करत असल्याचे पहायला मिळाले.
मार्च महिन्यापासूनच न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. अतिमहत्त्वाचे खटले वगळता इतर सर्व खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे वकिलांना त्याचा मोठा फटका बसला आहे. पूर्ण क्षमतेने न्यायालयीन कामकाज सुरू करावे, अशी मागणी वकीलवर्गातून होत आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अजूनही न्यायालयीन कामकाज सुरू नाही.
कौटुंबिक व इतर काही न्यायालयातील कामकाज ऑनलाईन व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुरू आहे. बऱयाचवेळा रेंज मिळत नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. तरीही न्यायालयाच्या आवारात पक्षकारांना थांबवून वकील न्यायाधीशांसमोर आपल्या पक्षकाराची बाजू मांडताना दिसत आहेत. मात्र अशा प्रकारे किती दिवस आम्ही काम करायचे? आता विविध क्षेत्रे सुरू झाली आहेत. कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून न्यायालयीन कामकाज सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सर्वच खटल्यांचे कामकाज सुरू करण्याची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून कामकाज बंद राहिल्यामुळे अनेक वकिलांना त्याचा फटका बसला आहे. पक्षकारांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवाणी खटले तर प्रलंबितच आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर आम्हाला न्याय कधी मिळणार, असे पक्षकार म्हणत आहेत. दिवाणी खटल्यांचा निकाल लागण्यास उशीर लागतो. त्यातच कोरोनामुळे आणखीनच उशीर होणार आहे. त्यामुळे पक्षकारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, त्याबाबत वकील काहीच करू शकत नाहीत. तेव्हा उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन तातडीने सर्वच खटल्यांचे कामकाज सुरू करावे, अशी मागणी होत आहे.