सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर नारकर यांच्यासह सहकाऱयांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी / कणकवली:
बळीराजा हा न्यायी, प्रेमळ, समतावादी, लोककल्याणकारी आणि दानशूर राजा होता. त्याला वामनाने कपटाने मारून त्याचे राज्य हिरावून घेतले होते. मात्र, शतकानुशतके बहुजन समाज बळीचं राज्य पुन्हा यावे, अशी आस लावून बसला आहे. बहुजन मायभगिनी तर प्रत्येक दिवाळीला भावाला ओवाळताना, ‘इडा पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ असे म्हणत आल्या आहेत. महाराष्ट्रात शेतकऱयाला ‘बळीराजा’ म्हटले जाते. त्यामुळे या न्यायी आणि प्रजाप्रिय राजाचा अपमान हा इथल्या बहुजन समाजाचा अपमान आहे. तेव्हा न्यायी बळीराजाचा अपमान करणाऱया चित्रावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर नारकर आणि सहकाऱयांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नारकर, प्रा. एस. व्ही. जाधव, प्रदीप ढोबळे, प्रतिमा परदेशी, डॉ. विवेक कोरडे, राहुल गायकवाड आदींनी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे, बळीराजा नेमका कोण? हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, कपिल या तत्ववेत्त्यांचा वारसा लाभलेला विरोचन पुत्र, प्रल्हादाचा नातू म्हणजे बळीराजा! अनेक पुराणकथांमधील संदर्भ पाहिल्यास बळीराजाचा वारसा स्पष्ट तर होतोच पण त्याचा देदीप्यमान इतिहासपट आपल्यासमोर येतो. बळीराजा आपल्या राज्यात होणाऱया उत्पन्नाचे आणि संपत्तीचे समान आणि न्यायपूर्वक वाटणी करणारा राजा होता. ‘रामायण’ आणि ‘महाभारता’तही संविभागी राजा म्हणून त्याला संबोधले गेले आहे. बळीराजा हा अत्यंत उदार, पराक्रमी, युद्धातून माघार न घेणारा सत्यवक्ता असल्याचे उल्लेख विविध प्राचीन साधनातून आलेले आहेत.
बळीराजाचे विविध पुराणकथांमध्ये आलेले वर्णन, नोंदी तर आहेतच पण त्याच्याविषयी आपल्याला वस्तुनि÷ संदर्भ, मौखिक, लोकसंस्कृती तसेच काही परंपरा यातूनही माहिती मिळते. तामिळनाडूमध्ये चेन्नईपासून 50 किमीवर महाबलीपुरम नावाचे गाव आहे. इथे पल्लव राजांनी बांधलेली मंदिरे, शिल्पे आहेत. महाबलिपुरम हे नाव बळीराजाच्या स्मृती म्हणून देण्यात आले असावे, हे स्पष्ट आहे. संत तुकारामांच्या अभंगातही बळीराजाचा उल्लेख असून महात्मा फुले यांनीही पोवाडा लिहीत बळीराजाची वेगळय़ा पद्धतीने मांडणी केली आहे. अशा बळीराजाचे चित्र चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले असून त्यावर बंदी घालण्यात यावी.