लहानपण मजेदार होतं. झोपेतून उठल्या उठल्या भूक लागायची. तोंड धुवून स्वयंपाकघरात प्रज्वलित पितळी स्टोव्हसमोर बसलं की स्टोव्हवरच्या पातेल्यातून येणाऱया चहाच्या वाफांनी भूक प्रज्वलित व्हायची. चहा उकळला की आई किल्ली फिरवून ज्योत मंद करून चहात दूध टाकायची. त्याकाळी फुलाफुलांची नक्षी असलेल्या कपबशा वापरात होत्या. आज कागदी कपात जितका कटिंग चहा मावतो त्याहून थोडा अधिक चहा त्या कपात मावत असे. चहा तेव्हा पेय नव्हते, तर कालची शिळी चपाती किंवा पावाचा तुकडा किंवा पार्ले जी बिस्कीटे भिजवण्याचे साधन होते. हे पदार्थ खाऊन क्षुधाशांती होईतो कपातला चहा संपून जाई. क्वचित आजोळी अहमदनगरला जायचो. भल्या सकाळी एक पठाण सायकलवरून ‘पाव-बिस्कीट-खारी-टोस-बुरून-किरीमरोल’ अशी आरोळी देत यायचा. बुरूनमधल्या ‘रू’ वर आणि किरीममधल्या ‘री’ वर अनुप जलोटासारखी कर्कश्श तान घ्यायचा. त्याच्या सायकलवर मागच्या बाजूला बांधलेल्या अल्युमिनियमच्या डब्यात हे सगळे पदार्थ नक्षीदार शैलीत मांडलेले असत. हे पदार्थ न्याहारीत येणे म्हणजे चंगळीची परमावधी होती.
हायस्कूलात गेल्यावर न्याहारी प्रकरण स्थगित झाले. शाळेची वेळ सकाळी साडेअकराची होती. सकाळी उठून नुसताच चहा घेऊन गृहपाठ उरकणे आणि मग जेवणच उरकून शाळेत जायचे असे. शनिवारी सकाळची शाळा असे, तेव्हा आणि रविवारी सकाळी न्याहारीसाठी पोहे, सांजा, क्वचित साबुदाण्याची खिचडी केली जाई.
न्याहारीला आणि चहाला स्वतंत्र दर्जा मिळाला तो अकरावीनंतर. कॉलेजमध्ये गेल्यावर. गुड लकमध्ये चहा किंवा कॅण्टीनमध्ये मिसळपाव, सिंगल इडली-वडा-बटाटेवडा सांबार यातील एखादा पदार्थ आणि दोघात एक किंवा तिघात दोन किंवा चौघात दोन कप चहा असे मेन्यू मुक्रर झाले. आता नवल वाटेल, पण तेव्हा या न्याहारीचा माणशी खर्च एक रुपयाहून कमी असे. खिशात फारच कमी पैसे असले तर तिघाचौघात एकच प्लेट भजी आणि चहा मागवला जाई. एखाद्या रविवारी पुण्याच्या लष्कर भागात फिरायला गेलो की ‘नाझ’मध्ये सामोशांची प्लेट मागवायचो. जीभ कितीही खवळली तरी पंचवीस पैसे किमतीचा एकच सामोसा परवडत असे. एकदाच एका मित्राने दोन रुपये किमतीची संपूर्ण प्लेट मागवली होती आणि आम्ही दोघांनी अधाशाप्रमाणे चार-चार सामोसे खाल्ले होते. नोकरी मिळाली आणि न्याहारीला नवे रंग लाभले.