वृत्तसंस्था/ ऍडलेड
18 नोव्हेंबरपासून भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिका खेळवल्या जाणार आहेत. दरम्यान या दौऱयासाठी भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडला विश्रांती देण्यात आली आहे. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणकडे प्रमुख प्रशिक्षक पदाची हंगामी स्वरुपाची जबाबदारी या दौऱयासाठी सोपविण्यात आली आहे.
या दौऱयासाठी भारतीय संघातील ज्येष्ठ खेळाडू विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, सलामीचा फलंदाज केएल राहुल, फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्वीनला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघाच्या संपूर्ण प्रशिक्षक वर्गाला ब्रेक देण्यात येणार आहे. 18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणाऱया भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणवर राहणार असून ऋषीकेश कानिटकर फलंदाज प्रशिक्षक तर साईराज बहुतले गालंदाज प्रशिक्षक म्हणून राहतील. लक्ष्मणकडे यापुर्वी एकदा भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी झिंबाब्वे आणि आयर्लंडच्या दौऱयावर बीसीसीआयने सोपविली होती. तसेच भारतात झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचे व्हीव्हीएस लक्ष्मण हे प्रमुख प्रशिक्षक होते. न्यूझीलंड दौऱयासाठी भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पांडय़ाकडे तर वनडे संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपविण्यात आले आहे. बांगलादेशविरुद्ध होणाऱया आगामी मालिकेत रोहित शर्माकडे पुन्हा संघाचे नेतृत्व सोपविले जाईल. तसेच या दौऱयासाठी अश्विन आणि कोहली यांचे भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. बांगलादेशच्या दौऱयात भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका, तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा बांगलादेश दौरा 4 डिसेंबरपासून सुरू होईल. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारच्या ऍडलेड येथील उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून 10 गडय़ांनी दणदणीत पराभव स्वीकारावा लागला होता. विराट कोहली तसेच राहुल आणि रोहित शर्मा हे लवकरच भारतात दाखल होणार आहेत. त्याच प्रमाणे सिडनी आणि पर्थ येथून भारतीय संघातील बरेच खेळाडू यापूर्वीच मायदेशाकडे प्रयाण केले असल्याचे समजते.