भारतीय क्रिकेट संघाने गावसकर-बॉर्डर कसोटी मालिकेत गाबाच्या अभेद्य गडाला खिंडार पाडत ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मिळविलेला विजय हा ऐतिहासिकच नव्हे, तर नव्या ‘टीम इंडिया’चा उदयच म्हणावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांची नकारात्मक गोलंदाजी, वर्णद्वेषी टिप्पणी, शेरेबाजीचा ओघ अन् दुखापतींचे ग्रहण अशा सगळय़ा कठीण परिस्थितीतही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली नव्या शिलेदारांनी न डगमगता घडविलेले मानसिक कणखरता व वीजिगीषू वृत्तीचे दर्शन हेच खरे तर ऑस्ट्रेलिया दौऱयाचे वैशिष्टय़ ठरते. भारताने पहिल्या कसोटीत सपाटून मार खाल्ल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याची 4-0 ची भविष्यवाणी खरी ठरणार की काय, असेच कुणालाही वाटावे. परंतु, अजिंक्यच्या परिसस्पर्शानंतर पुढच्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये संघाने जो ‘क्लास’ दाखवून दिला, तो क्लासिकल संगीताइतकाच खोलवर म्हटला पाहिजे. अर्थात रहाणेचे धीरगंभीर, प्रगल्भ व व्यापक नेतृत्व हा या विजयातला महत्त्वपूर्ण ‘गाभा’ ठरतो. दुसऱया कसोटीतील शतकातून संपूर्ण संघाला प्रेरित करणाऱया या संयमी कर्णधाराने एकूणच व्यूहरचना, गोलंदाजातील बदल, फलंदाजीतील क्रम, क्षेत्ररक्षणाचे जाळे अशा बहुविध पातळीवर कल्पकता दाखविली. त्याच्या स्फूर्तिदायी नेतृत्वामुळेच गोलंदाजीबरोबरच तळापर्यंत भारतीय फलंदाजी सहजसुंदर पद्धतीने फुलत गेली. या त्रिवेणी संगमामुळेच जवळपास तीन दशके गाबावर अपराजित असलेल्या कांगारूंचे 328 धावांचे बलाढय़ आव्हान पेलणे शक्य झाले. इतिहासात डोकावल्यास 1951 मध्ये विंडिजने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 236 धावांचे लक्ष्य पार केले होते. त्यानंतर मागच्या सात दशकांमध्ये चौथ्या डावात ही कामगिरी कुणालाही साधली नव्हती. हा विक्रम भारतीयांना मोडीत काढावा, हे निश्चितच अभिनंदनीय. निखळ खेळाशिवाय स्लेजिंग, बाऊन्सरसह विविध आयुधे वापरून प्रतिस्पर्ध्याला कशा पद्धतीने नामोहरम करता येईल, याकडे ऑस्ट्रेलियाने खेळाडूंचा कटाक्ष असतो. या मालिकेत अशा पारंपरिक सीमा ओलांडल्यानंतर आणि अर्धा अधिक अनुभवी भारतीय संघ जायबंदी झाल्यावरही घरच्या मैदानावर कांगारूंचा इतका दारुण पराभव व्हावा, हे आत्मपरीक्षण करायला लावणारे होय. आक्रस्ताळेपणापेक्षा संयम नि तोंड चालविण्यापेक्षा बॅटवरील हुकूमत महत्त्वाची असल्याचा धडादेखील या सामन्यातून यजमानांनी घ्यायला हरकत नाही. तसेच पाँटिंगच्या बोलण्यातील पॉईंटही लक्षात घ्यावा. तुलना करणे योग्य नसेलही. तथापि, विराटपेक्षा अजिंक्यचे नेतृत्व अधिक ‘मॅच्युअर्ड’ असल्यावरदेखील या दौऱयाने शिक्कामोर्तब झाले हे मान्य करावे लागते. शुभमन गिल हे भारताचे शुभवर्तमानच मानायला हवे. चौथ्या कसोटीतील त्याच्या 91 धावा संजीवकच म्हणाव्या लागतील. या मालिकेतील त्याचे सातत्य, प्रत्येक सामन्यागणिक खेळ उंचावण्याची क्षमता व उपजत शैली यातून तो उद्याच्या भारताचे भविष्य असल्याचेच अधोरेखित होते. चेतेश्वर पुजारामधील खेळपट्टीवर थांबून राहण्याची ‘चेतना’ हा तर स्थितप्रज्ञतेचाच आविष्कार. अखेरच्या कसोटीत शुभमनसोबत जोडलेल्या 118 धावा असोत वा तीन अर्धशतके असेनात, स्विंगसाठी नंदनवन असलेल्या भूमीत खेळपट्टीवर टिकून कसे राहायचे, हे त्याच्याकडून शिकावे. आपली गुणवत्ता कुठल्या पातळीवरची, हे ऋषभ पंतने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. कोणत्याही दबाव दडपणाशिवाय आपल्या अंदाजात खेळणे, हा पंतचा विशेष होय. सिडनीपाठोपाठ ब्रिस्बेनमध्येही त्याच्याकडून धावांची बरसात होणे, हा त्याची फलंदाजी अधिक भरवशाची होत असल्याचेच निदर्शक. विजयी चौकार लगावत शेवटपर्यंत टिकण्याची त्याची कामगिरी ही ‘मॅचविनर’ म्हणून त्याच्याकडून अपेक्षा वाढविणारी म्हणता येते. वॉशिंग्टन हा गोलंदाजी व फलंदाजीचे सुंदर रसायनच म्हटले पाहिजे. पहिल्या डावातील अर्धशतक, दुसऱया डावातील 22 धावा नि गोलंदाजीतील प्रभाव यातून त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केलेली दिसते. शार्दुल ठाकूरही असाच शार्दुल विक्रीडित वृत्तासारखा. ‘देवाने दिधले असे जग तये आम्हांस खेळावया,’ हा आविर्भाव बाळगून समर्पित खेळ करणारा. दोन्ही डावात मिळून सात बळी नि पहिल्या डावातील झुंजार 67 धावा, ही कामगिरी त्याच्यातील क्रीडाप्रतिभा दाखवून देण्याकरिता पुरेशी आहे. महमद सिराजबद्दल काय बोलावे. वर्णद्वेषी टिप्पणीला त्याने पाच बळी घेत दिलेले उत्तर तेंडुलकरी, द्रविडी परंपरेलाच साजेसे. बुमराह, महमद शमी, उमेश यादव यांच्या गैरहजेरीतही ज्या पद्धतीने या नव्या दमाच्या गोलंदाजांनी भारतीय तोफखाना धगधगत ठेवला, त्यातून भारत केवळ एखाद दुसऱया स्टार बॉलरवर अवलंबून राहिलेला नाही, हा संदेश क्रिकेटजगतात जातो. एकेकाळी भारतीय फलंदाजी ही तेंडुलकर, द्रविड, गांगुलीवरच निर्भर असे. किंबहुना, आता ती केवळ विराट वा रोहितवर आधारलेली नाही, हे यंग टॅलेंटने दाखवून दिले आहे. हा संघातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणायला हवा. मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ अशा काही भरवशाचा खेळाडूंनी अपेक्षाभंग केला. संपूर्ण दौऱयात भारताचे आठ ते नऊ खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे पहिल्या कसोटीतील रहाणे व पुजारी वगळता उर्वरित संघ नवखा वा वेगळाच. असा तुलनेत अननुभवी संघही कसोटीला खरा उतरतो, हे सुखावणारे होय. भारताकडे एक नव्हे; तर दोन संघ आहेत, हा संदेशही यातून क्रिकेटविश्वात जाऊ शकतो. स्वाभाविकच पुढच्या काळात संघात स्थान मिळविण्यासाठी अधिक चुरस असेल. वन डे, ट्वेंटी ट्वेंटीपेक्षा कसोटीचा बाज वेगळा आहे. येथे फलंदाज, गोलंदाज सर्वांचाच कस लागतो. अशा कसोटीच्या वेळी, तेही परदेशातील खेळपट्टय़ांवर नांगर टाकणे, ही मोठी गोष्ट होय. म्हणूनच या ‘न्यू इंडिया’ला उचकविण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा ज्याने त्याने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलेले बरे. पुढच्या महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱयावर येईल. वॉनला वॉर्न केलेच आहे. त्यांना त्यांची जागाही दाखविण्याची संधी असेल.
Previous Articleराज्यपाल होण्याची इच्छा
Next Article वीजबिलांच्या थकबाकीमुळे महावितरणवर महासंकट
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.