कोल्हापूर प्रतिनिधी
जागतिकीकरणात अनेक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत असताना आपल्या समाजातील एक घटकाशी भेदभाव होताना दिसत आहे. समाजाने जागृत होवून तृतीयपंथीयांनाही माणूस म्हणून वागवले पाहिजे. कारण तृतीयपंथीयांना समाजाचा अविभाज्य घटक मानले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी केले.
न्यू कॉलेजमधील समाजशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक तृतीयपंथी दिवस साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. पाटील यांच्या हस्ते मायुरी आळवेकर, अंकिता आळवेकर, दुर्गा पिसाळ, जावेद पिंजारी यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. ंयाप्रसंगी ते बोलत होते.
प्राचार्य पाटील म्हणाले, पेकशाही असलेल्या भारतासारख्या देशात तृतीयपंथी लोकांना सन्मानाने जगण्याची अधिकार आहे. त्यांना समान संधी देण्याची जबाबदारी समाजाची आहे. राज्यघटनेतील कलमानुसार त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी दिली आहे. त्यामुळे किमान भविष्यात तरी समाजाने त्यांचा सन्मान करावा. सत्काराला उत्तर देताना मयुरी आळवेकर म्हणाल्या, तृतीय पंथीयसुध्दा माणूस आहेत. त्यामुळे समाजाने तृतीय पंथीयांना सन्मानाने व माणूस म्हणून वागवले पाहिजे. आमच्याकडे तुच्छतेने न पाहता माणूस म्हणूनच पाहावे.
जागतिक दिनानिमित्त अलौकिक कार्य करणाऱया तृतीयपंथीयांचे पोस्टर प्रदर्शन भरवले होते. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ अर्चना कांबळे यांनी केले. आभार डॉ. मनीषा नाईकवाडी मानले. देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे डॉ. एस. डी. सूर्यवंशी, प्रा. अरविंद घोडके, विद्यार्थी व प्राध्यापक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.