मडगाव पालिकेचे मार्केट निरीक्षक -पोलिसांकडून हस्तक्षेप, घालून दिलेल्या अटींनुसार दुकाने खुली ठेवणे भाग
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या न्यू मार्केटमधील सर्व दुकाने मंगळवारी सुरू करण्यात आली. मात्र नंतर पालिकेचे मार्केट निरीक्षक व पोलिसांनी हस्तक्षेप करून घालून दिलेल्या अटींनुसार दुकाने खुली ठेवण्यास भाग पाडले.
न्यू मार्केटमध्ये मागील महिन्याभरापासून आळीपाळीने पांढऱया व पिवळय़ा रेषेतील दुकाने खुली करण्यात येत होती. व्यापारी संघटनेकडे या व्यवस्थेमुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आल्याने मंगळवारपासून सर्व दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी सोमवारी दिली होती.
त्यानुसार मंगळवारी सगळी दुकाने खुली करण्यात आली. मात्र अजूनही चौथा लॉकडाऊन संपलेला नाही. तसेच पालिका अधिकारिणीने सर्व दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतलेला नसल्याने मार्केट निरीक्षक व पोलिसांनी सर्व दुकाने खुली ठेवण्यास आक्षेप घेतला आणि मंगळवारी ठरल्यानुसार ज्या रेषेतील दुकाने खुली राहणार होती ती सोडून अन्य बंद करण्याचे निर्देश दिले.
आळीपाळीनेच दुकाने उघडावी लागणार ः पालिका
काही व्यापाऱयांनी नियमानुसार आपली दुकाने बंद करून निर्देशाचे पालन केले, तर काहींनी दुकाने खुली करून साहित्य मांडलेले असल्याने दुपारी 12 पर्यंत व्यवसाय करू द्यावे अशी विनंती केली. त्यांना तशी मुभा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र आज बुधवारपासून नियमानुसार आळीपाळीने रेषेचे पालन करून दुकाने खुली करावी लागणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
1 जूनपासून सर्व दुकाने खुली करणार ः शिरोडकर
यासंदर्भात न्यू मार्केट संघटनेचे अध्यक्ष शिरोडकर यांचे मत जाणले असता, आम्ही आता लॉकडाऊन संपेपर्यंत वाट पाहणार असून त्यानंतर 1 जूनपासून सर्व दुकाने खुली केली जातील, असे त्यांनी सांगितले. न्यू मार्केटमध्ये पिवळी व पांढरी रेषा मारून आळीपाळीने दुकाने खुली ठेवण्याची अट घालण्यात आली असून मागील तीन महिने आम्ही नियम पाळत आलो आहोत. मात्र आता हे जास्तच झाले आहे. कारण आमच्या व्यवसायावर विपरित परिणाम होऊ लागला आहेत, असा दावा शिरोडकर यांनी सोमवारी केला होता.
पहाटे 3 ते 7 पर्यंत पिंपळकट्टा चौक ते लिली गार्मेन्टपर्यंत बाजार भरत असतो. यावेळी सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे तसेच मास्क घालण्याचे सर्व नियम धाब्यावर बसविले जातात. तरीही पालिका व पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. मास्क न घातल्यास बाजारपेठेच्या आत मात्र दंड दिला जातो. सकाळी 7 नंतर वाहनांमध्ये साहित्य ठेवून रस्ते व पदपथांवर बेकायदेशीररीत्या व्यवसाय होत असतात. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. सरकार सीमा खोलून सर्वांना आत घेत आहे. नियम मात्र बाजारपेठांतील व्यापाऱयांच्या माथी मारण्यात येत असतात, असेही शिरोडकर यांनी सोमवारी म्हटले होते.
…तर गांधी मार्केटातूनही मागणी झाली असती
दरम्यान, न्यू मार्केटमधील दुकाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून खुली करू दिली गेली असती, तर गांधी मार्केटमधील विपेत्यांनी आपली दुकाने खुली करण्याची मागणी उचलून धरली असती व दोन्ही मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगविषयीच्या नियमांचे तीन तेरा वाजले असते, अशी प्रतिक्रिया गांधी मार्केट विक्रेते संघटनेचे पदाधिकारी फजलू रेहमान यांनी व्यक्त केली.