महिला रुग्णालय सांडपाणी निचरा प्रकल्पाचा पत्ताच नाही
प्रतिनिधी/ रत्नागिरी
नजीकच्या उद्यमनगर येथे उभारलेल्या भव्य अशा महिला रुग्णालयात अनेक कामे अपूर्ण व निष्कृष्ट पद्धतीने करण्यात आल्याची बाब समोर आली आहे, मात्र त्याहून धक्कादायक बाब म्हणजे येथे सांडपाणी निचरा प्रक्रिया प्रकल्प झालाच नसताना त्यावर 76 लाख रुपये खर्च झाल्याचे बांधकाम विभागाकडून दाखवण्यात आले. ही बाब मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनास आली असता याबाबत चौकशी समितीची नियुक्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे..
मुळात महिला रुग्णालय बांधकामाला 14 कोटी प्रशासकीय मान्यता होती. मात्र 10 कोटी 34 लाख 23 हजार 892 रुपयांच्या खर्चाला शासनाकडून तांत्रिक मान्यता प्राप्त होती. मुळात हे बांधकाम पूर्णत्वाला जाण्यासाठी 7 ते 8 वर्षाचा कालावधी उलटला, मात्र अद्यापही ही इमारत सर्व बाबींनी परिपूर्ण नाही. या ठिकाणी रुग्णालयासमोरच शासकीय क्वॉटर्स उभारण्यात आले आहे. याचे काम अर्धवट स्थितीत अनेकवर्ष पडून आहे. याच ठिकाणी सांडपाणी निचरा करण्यासाठी जो प्रकल्प उभारण्यात येणार होता, त्या साहित्यांना गंज पकडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कोणताही प्रकल्प झालेला नसतानाही सांडपाणी निचरा प्रकल्पासाठी 76 लाख खर्च झाल्याचे बांधकाम विभागाने दाखवले आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
सांडपाणी निचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी 23 मार्च 2018 रोजी 1 कोटी 20 लाखाची वर्कऑर्डर ठेकेदाराला देण्यात आली होती. मात्र आज 3 वर्ष उलटून गेली तरी सांडपाणी निचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाला नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. येथील यंत्रसामुग्री सडून गेली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प साहित्याची दुरवस्था झाली आहे. या बाबत पत्रकारांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली असता ही बाब गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
..तर खर्च दाखवलाच कसा?
जिल्हय़ात आज कोरोनाची संख्या 10 पटीने वाढत असताना या रुग्णालयाचे व समोरील क्वॉटर्सचे काम परिपूर्ण झाले असते. या घडीला प्रशासनाला आणखीन मदत झाली असती, मात्र बांधकाम विभागाने काम न करताच हा खर्च कसा दाखवलाच, या बाबत आता संशय निर्माण होऊन चर्चांना उधाण आले आहे.
सांडपाणी वाहतेय रस्त्यावरुन
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प झालाच नसल्याने महिला रुग्णालयातील सांडपाणी याच परिसरातून रस्त्यावरुन जात आहे. या बाबत आजूबाजूच्या नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र सध्या तात्पुरत्या स्वरुपात या सांडपाण्यावर मलमपट्टी जरी केली असली तरी ही बाब जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने घेणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.