पुढाऱ्यांनी केला घफला शेतकऱ्यांना बनवला बळीचा बकरा
प्रतिनिधी / सातारा
2010 साली पाटण तालुक्यातील तारळे भागातले अज्ञानी शेतकऱ्यांना सरकारची योजना आहे. म्हणून गाव पुढाऱ्यांनी कागदपत्रे आणि सह्या नेल्या. त्याकरीता बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते काढले. तेव्हापासून आजपर्यंत तो शेतकरी बँकेची पायरी चढला नाही. असे अनेक शेतकऱ्यांना तारळे भागात बँकेने वन टाइम सेटलमेंट करा अशी नोटीस इंग्रजीत पाठवून दिली आहे. आधीच मराठी नीट वाचता न येणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती नोटीस पडताच भीतीने गाळण उडालेले शेतकरी बँकेत गेले पण तेथे अधिकारी नीट माहिती देत नसल्याने आत्महत्या करायची काय असा सवाल त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. पंजाबच्या शेतकरी आंदोलनाच्या नावाने गळे काढणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तथाकथित संघटनाना जिल्हातील शेतकऱ्यांवरील अन्याय दिसत नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करू लागला आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. राजकीय पुढारी त्यांचा सोयीनुसार वापर करतात. त्याचाच प्रत्यय पाटण तालुक्यातील तारळे भागात नुकताच आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे जेव्हा वसुलीचे नोटीस शेतकऱ्यांना दि.27जुलै 2020 ला मिळाले तेव्हा ते नोटीस इंग्रजीत असल्याने त्यात काय आहे हे न समजल्याने तसेच ठेवून दिले होते.त्यात लॉकडाऊन होता. त्यामुळे शेतकरी बँकेत येऊन चौकशी करत नव्हता. मात्र, बँकेची नोटीस म्हणल्यावर शेतातली कामे आटोपून आज जेव्हा बँकेत शेतकरी जाऊन विचारतो तेव्हा जी थोडीफार बँकेतुन माहिती मिळते तेव्हा भीतीने गांगरून जातो. डोक्याला हात लावून हताश होऊन बँकेच्या साहेबांना विनंती करतो की साहेब मी कर्जच घेतलं नाही तर पैस भरू कोठून, साहेब मला कर्जाची माहिती द्या अशी विनंती ते करू लागले. मात्र, बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्ज मागणी प्रस्ताव दिला नाही. परंतु 2010 मध्ये बँकेचं पासबुक काढले तेव्हा काही पुढाऱ्यांनी तुम्हाला एरांड्या लावण्यासाठी शासन अनुदान देते तुम्ही कागदपत्रे द्या, सह्या करा, अंगठे द्या म्हणून विश्वास संपादन करून त्यावेळी सह्या, अंगठे नेल्याची घटना आठवली. तेव्हापासून एकदाही बँकेची पायरी काही शेतकऱ्यांनी चढली नाही. आज मात्र, नोटीसचा अर्थ ऐकून आश्चर्य वाटले.
कर्जच मी घेतलं नाही तर पैसे कोठून भरणार
मला ही नोटीस काय आहे. माहीत नव्हतं. माझ्या पुतण्याला घेऊन मी बँकेत गेलो तेव्हा ही वसुलीची नोटीस असल्याचे समजले. माझे खाते दि.17 मार्च 2010 ला काढले. तेव्हापासून मी कधी बँकेत आलो नाही. मात्र, एका पुढाऱ्याने माझ्याकडून सही घेतली होती. पैसे मिळतील म्हणून सांगायचा पण पुढे मी विसरून गेलो. माझ्या खात्यात दि.18 मार्च 2010 ला 87 हजार 165 रुपये कोठून जमा झाले माहीत नाही, त्याच दिवशी 38 हजार 655 रुपये कोणी काढले मला माहित नाही, दि.19मार्च 2010 रोजी 48 हजार 510 रुपये कोणी काढले मला माहित नाही.मी कर्जच काढले नाही तर मला नोटीस कशी ?,मी हे पैसे कसे भरू, तसेच माझ्या सातबाऱ्यावर बँकेचा 5 हजाराचा बोजा कसा, असा प्रश्न केळेवाडी येथील शेतकरी ज्योतिराम सपकाळ यांनी तरुण भारतकडे व्यक्त केला.
मोठा घोटाळा असण्याची शक्यता
तारळे भागात काहीजणांनी त्यावेळी तत्कालीन बँकेचे अधिकारी सुपे यांना हाताशी धरून सर्वसामान्य शेतकऱ्यांना जमिनीवर कर्जे घेतली गेल्याचे सांगण्यात येते.यामध्ये अनेक शेतकरी त्यांच्या अज्ञानामुळे त्यांना बळी पडले आहेत. याप्रकरणी जे पंजाबच्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देतात त्यांनी लक्ष घातले तर जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांची फसवणूकीतून सुटका होईल, त्याचा सातबारा कोरा होईल, अशी अपेक्षा खराखुरा शेतकरी व्यक्त करू लागला आहे.