सैन्यप्रमुख नरवणे यांचे उद्गार – 10 व्या फेरीतील चर्चेनतर चांगला परिणाम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पूर्व लडाखमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी होणे आणि पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण काठावरून भारत तसेच चीनचे सैन्य मागे हटण्यासंबंधी सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी बुधवारी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. हा अत्यंत चांगला परिणाम राहिला असून सर्वांसाठीच लाभदायक असल्याचे माझे मानणे आहे. दोन्ही देशांसाठी ही विजयाची स्थिती आहे. आतापर्यंतच्या 10 फेऱयांमधील चर्चेमधून चांगला परिणाम प्राप्त झाला आहे. पूर्व लडाखमध्ये अन्य मुद्दय़ांवरही तोडगा काढण्यासाठी रणनीती असल्याचे सैन्यप्रमुखांनी म्हटले आहे.
आमच्या इच्छेनुसारच चीनसोबतचे भारताचे नाते असणार आहे. आमच्या इच्छेनुसारच चीनसोबतचे आमचे संबंध विकसित होतील हा पूर्णपणे सरकारचा विचार असल्याचे मला वाटते असे उद्गार नरवणे यांनी काढले आहेत.
सीमेवर अस्थैर्य नको
एक शेजारी म्हणून सीमेवर शांतता आणि स्थैर्य रहावे असे आम्ही इच्छितो. सेमेवर कुठल्याही प्रकारची अस्थिरता राहावी असे कुणालाच वाटत नाही. लडाख येथील तणावादरम्यान चीन आणि पाकिस्तान यांच्यात संगनमताचे कुठलेच संकेत दिसून आलेले नाहीत. पण भारत एक-दोन नव्हे तर अडीच आघाडंय़ावरील लढाईसाठी दीर्घकालीन व्यूहनीति तयार करतो असे सैन्यप्रमुख म्हणाले. चीन आणि पाकिस्तान या दोन आघाडय़ांसह अंतर्गत सुरक्षेचा ते उल्लेख करत होते.
सर्व घटकांचे योगदान
तणावाच्या प्रारंभापासूनच भारतातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केले आहे. राजकीय स्तरावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी चीनमधील नेत्यांशी चर्चा केली आहे. या प्रकरणी आम्ही सर्वजण एकत्र होतो. पुढील मार्ग कसा असावा यावर चर्चा करत आम्ही काटेकोर योजना आखली होती. जे काही घडले, हे त्या योजनेमुळेच शक्य झाले आहे. आतापर्यंत प्राप्त झालेले परिणाम अत्यंत चांगले असल्याचे सैन्यप्रमुख नरवणे यांनी विवेकानंद इंटरनॅशनल फौंडेशकडून आयोजित एका वेबिनारमध्ये बोलताना म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने दिलेला सल्ला अत्यंत उपयुक्त होता आणि सामरिक स्तरावरील प्रकरणांमध्ये त्यांच्या दृष्टीकोनाने निश्चितपणे प्रतिक्रिया पुढे नेण्यास मदत केल्याचे सैन्यप्रमुख म्हणाले.