सरकारी सूत्रांची माहिती, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे राज्यसभेत व्यक्तव्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पूर्व लडाखमध्ये गेले 10 महिने सुरू असणारा भारत-चीन संघर्ष निवळण्याच्या मार्गावर आहे. या भागातील पँगाँग सरोवराच्या परिसरातून दोन्ही देशांनी आपली सेना मागे घेण्यास प्रारंभ केला असून ही प्रक्रिया पूर्ण होण्यास 15 ते 20 दिवस लागतील अशी शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही राज्यसभेत सैन्य माघारीसंदर्भात वक्तव्य केले.
तीन दिवसांपूर्वी भारत आणि चीन यांच्या सैन्याधिकाऱयांमध्ये चर्चेची नववी फेरी पार पडली. यात या माघारीचा कार्यक्रम तयार करण्यात आला होता. चीनच्या सैनिकांनी सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. तो भारताच्या सैनिकांनी वेळीच हाणून पाडला. इतकेच नव्हे, तर या सरोवराच्या दक्षिणेच्या बाजूला असणाऱया आठ पर्वतशिखरांवर चढाई करून उंचावरची स्थाने आपल्या ताब्यात घेतली. अशा प्रकारे भारताने चीनच्या सैन्यावर दबाव वाढविला होता. या पर्वतशिखरांवरून भारत सर्वात शेवटी सैन्यमाघार करेल, असे ठरविण्यात आले आहे.
फिंगर 8 पर्यंत चीनची माघार
पँगाँग सरोवराच्या उत्तर भागातून चीन फिंगर 8 पर्यंत माघार घेणार आहे. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी ही माघार प्रक्रिया कोणत्याही अडथळय़ाविना पूर्ण होईल, अशी शक्यता आहे. तथापि, भारतीय सैन्य कोणताही धोका पत्करणार नसून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व त्यानंतरही सीमेवर डोळय़ात तेल घालून लक्ष ठेवणार आहे. भारताची यासंबंधीची योजना तयार आहे, असे सांगण्यात आले.
करण्यात आला करार
पँगाँग येथून सैन्यमाघारीचा करार चीनशी करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत कारवाई झाली आहे. भारत अत्यंत सावध असून धोका होणार नाही, अशा प्रकारे योजना आखत आहे. पँगाँग येथील माघार पूर्ण झाल्यानंतर 48 तासांमध्ये पुन्हा दोन्ही देशांच्या सेनाधिकाऱयांची बैठक होणार असून प्रक्रियेचा आढावा घेण्यात येईल. चीनने फिंगर 8 पर्यंत माघार घेण्यास प्रारंभ केला असून दोन्ही देश या भागात गस्त घालणार नाहीत, अशी माहिती राजनाथसिंग यांनी दिली. पँगाँग सरोवर हा संघर्षाचा सर्वात महत्वाचा बिंदू आहे.
भारत फिंगर 3 पर्यंत येणार
भारताची सेना या करारानुसार फिंगर 3 पर्यंत मागे येऊन धनसिंग थापा चौकीच्या परिसरात येणार आहे. याचाच अर्थ असा की दोन्ही सेना एप्रिल 2020 पूर्वी जी स्थिती होती, तेथपर्यंत माघार घेणार आहेत. त्यामुळे फिंगर 3 ते फिंगर 8 या भागात कोणाचीही गस्त राहणार नाही, असा करार करण्यात आला आहे.
गस्त केव्हा सुरू होणार
सैन्य माघारीचा प्रथम टप्पा पूर्ण झाल्यानंतर दोन्ही देशांचे राजकीय नेते आणि सैन्याधिकारी चर्चा करणार आहेत. त्यानंतर आणखी एक करार केला जाईल. त्यानुसार कोणत्या देशाच्या सैनिकांनी कोठवर गस्त घालायची हे ठरविण्यात येईल. चीनने सध्या फिंगर 4 ते फिंगर 8 या भागात अनेक बंकर्स आणि बांधकामे उभी केली आहेत. तीही चीनला काढून घ्यावी लागणार आहेत.
सैनिक हालचालींवर तात्पुरता निर्बंध
संपूर्ण क्षेत्रातून माघार प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दोन्ही देशांच्या सेना माघारीशिवाय आणखी कोणतीही हालचाल करणार नाहीत. तसे बंधन करारात घालण्यात आले असून ते उभयपक्षी मान्य करण्यात आले. भारताने पँगाँगच्या दक्षिणेला मुखपारी, राचिन आणि मागर येथील अनेक मोक्याची पर्वतशिखरे गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या ताब्यात घेतली होती. तेथून भारताच सैनिक सर्वात शेवटी खाली उतरणार आहेत. मात्र, हे करत असताना अत्याधिक सावधानता बाळगली जाणार असून कोणताही धोका झाल्यास पुन्हा चढाई करणे शक्य आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली. राजनाथसिंग यांनी राज्यसभेतही अशाच अर्थाचे वक्तव्य केले.
भारताचा वरचष्मा
भारतीय सैनिकांनी अत्यंत धाडसाने आणि कौशल्याने अनेक पर्वतशिखरे ताब्यात घेतल्याने या संघर्षात भारताचा वरचष्मा प्रस्थापित झाला आहे. हा दबाव असाच पुढे सुरू ठेवला जाणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर राखावा आणि या रेषेवर लक्ष ठेवावे असे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती राजनाथ सिंग यांनी राज्यसभेत या विषयावर बोलताना दिली.
चीनचे किमान 45 सैनिक ठार
जून 2020 मध्ये गलवान खोऱयात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या जोरदार मारामारीत चीनचे किमान 45 सैनिक ठार झाले होते, असा गौप्यस्फोट रशियाच्या ‘तास’ या वृत्तसंस्थेने केला आहे. या संघर्षात भारताच्या 20 सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले. भारताने ही माहिती उघड केली. मात्र चीनने अद्यापही त्याची हानी दडविली आहे. या वृत्तसंस्थेने आता ती उघड केली आहे.
महत्वपूर्ण घडामोडी…
- तणाव निवळण्याच्या दिशेने 10 महिन्यांमध्ये प्रथमच ठोस कृती
- यावेळी माघार प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची आहे दाट शक्यता ड सर्व हालचालींवर भारत ठेवणार सावधपणे आणि बारकाईने लक्ष