ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील पँगाँग सो, डेपसांगमधूनमाघार घेण्यास चिनी सैन्याने नकार दिला आहे. तसेच अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्याही चीनने वाढवली आहे. त्यामुळे भारत-चीनमधील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांच्या कमांडर स्तरावर होणारी पाचवी लष्करी बैठक आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे.
भारत-चीनमधील सीमारेषेवरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी यापूर्वी 4 बैठका झाल्या. पाचवी बैठक 30 जुलैला होणार होती. मात्र, चिनी सैन्याची सीमारेषेवरील आक्रमकता पाहता भारताने या बैठकीसाठी फारसा आग्रह धरला नव्हता. 14 कॉर्स कमांडर जनरल हरिंदर सिंह आणि चिनी मेजर जनरल लुई लिन यांच्यात चर्चा होणार होती.
आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये दोन्ही देशांनी सीमारेषेवरील सैन्य मागे घेण्यावर एकमत झाले होते. दोन्ही देशांनी काही भागातील सैन्य मागे घेतले. मात्र, चीनने अद्याप पूर्व लडाखमधील पँगाँग सो, डेपसांगमधून माघार घेतली नाही. त्यामुळे भारतानेही युद्धसज्जता ठेवली आहे.