वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-चीनच्या विदेश मंत्र्यांची 10 सप्टेंबर रोजी मॉस्को येथे झालेल्या बैठकीपूर्वी लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान गोळीबार झाला होता. पूर्व लडाखमध्ये पँगोंग सरोवराच्या उत्तर काठावर दोन्ही देशांच्या सैनिकांकडून 100 ते 200 राउंड हवेत गोळीबार झाला होता. ही घटना रिजलाइनवर घडली असून तेथेच फिंगर-3 आणि फिंगर-4चे भाग जोडले जातात.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पँगोंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण काठावर अनेक घडामोडी घडल्या होत्या. अनेकदा गोळीबारही झाला असल्याने तणाव अद्याप कायम आहे. चुशूल सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी भारत आणि चीनचे सैनिक परस्परांपासून केवळ 300 मीटरच्या अंतरावर तैनात आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या सैन्याधिकाऱयांदरम्यान पुन्हा चर्चा होणार आहे.
यापूर्वी 7 सप्टेंबर रोजी भारत-चीनने मुकपारी हाइट्स भागात गोळीबाराच्या घटनेसंबंधी वक्तव्य प्रसिद्ध केले होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 45 वर्षांनी गोळय़ा झाडल्या गेल्या आहेत. दोन्ही देशांनी याकरता परस्परांना जबाबदार ठरविले आहे. परंतु पँगोंग सरोवराच्या भागातील गोळीबारापर्यंत आतापर्यंत कुठलेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.
3 वेळा घुसखोरीचा प्रयत्न
29-30 ऑगस्टच्या रात्री चिनी सैनिकांनी पँगोंग सरोवराच्या दक्षिण काठावरील टेकडीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर सैन्य अधिकाऱयांच्या चर्चेचे सत्र सुरू झाले. परंतु चीनने पुढील 4 दिवसांत 2 वेळा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे.
शांततेच्या मार्गाने सीमा वाद सोडविण्यासाठी 10 सप्टेंबर रोजी मॉस्कोमध्ये दोन्ही देशांच्या विदेशमंत्र्यांची बैठक झाली होती. यात सैन्य मागे घेण्यासह 5 मुद्दय़ांवर सहमती झाली होती. परंतु चीन वारंवार स्वतःचा शब्द मेडीत काढत असून या भागात सातत्याने हालचाली करत आहे.