ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने औषधे व आरोग्य सुविधांची टंचाई अधिक भेडसावू लागली आहे. जिल्ह्याजिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. करोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले असून बीड जिल्ह्याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. हे पत्र ट्वीट करताना पंकजा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
आरोग्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र पंकजा यांनी ट्वीट देखील केले आहे. या पत्राद्वारे त्यांनी बीड जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती टोपे यांना दिली आहे. ‘बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. आतापर्यंत 729 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 34 हजार 989 लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत असली तरी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. पुरेशी लस नसल्याने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. या साऱ्याकडे आपण जातीने लक्ष द्यावे व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती देखील केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या, राज्याला मिळालेल्या लसीच्या दोन लाख डोसेसपैकी केवळ 20 डोस बीड जिल्ह्याला मिळाले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे हे अतिशय खेदकारक आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लसीचे पुरेसे डोस उपलब्ध करून द्यावेत,’ असेही पंकजा यांनी म्हटले आहे.