प्रतिनिधी / कोल्हापूर
पंचगंगा नदीत उडी घेऊन दोन मुलींसह मातेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आज सायंकाळी कोल्हापुरातील पंचगंगा घाट येथे तिन्ही मृतदेह आढळले. सुनेत्रा संतोष सावळकर (वय ३०), श्रीशा संतोष सावळकर (११), खुशी संतोष सावळकर (७) अशी मृतांची नावे आहेत. मृत महिला ही वडणगे येथील असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत सुनेत्रा या वडणगे (ता. करवीर) येथील इंदिरानगर बेघर वसाहतीमध्ये राहत होत्या. सुनेत्रा यांचे पती संतोष सावळकर हे बांधकाम व्यावसायिक होते. पाच वर्षांपूर्वी त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सुनेत्रा सासू-सासरे आणि दोन मुलींसह वडणगे येथे राहत होत्या.
सांगलीतील एका फर्ममध्ये नोकरी करून सुनेत्रा कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होत्या. काल, शनिवारी सकाळी दहा वाजता कामावर जातो असे सांगून त्या दोन्ही मुलींसह घरातून बाहेर पडल्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत मुलीसह सुनेत्रा घराकडे न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. आज दिवसभरही ही शोधाशोध सुरू होती. अखेर सायंकाळच्या सुमारास पंचगंगा घाटावर दोन मुलींसह महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना आढळून आला. पोलिसांनी सावळकर कुटुंबीयांना बोलावून घेतले असता मृतांची ओळख पटली. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याने वडणगे परिसरात शोककळा पसरली आहे.