नदीपात्रत रसायनयुक्त सांडपाणी आल्याने नदी प्रदूषित; परिसरात दुर्गंधी
प्रतिनिधी / कुरुंदवाड
पंचगंगा नदीपात्रत रसायनयुक्त सांडपाणी आल्याने नदी प्रदूषित झाली आहे. शिरढोण पुल ते तेरवाड बंधाऱ्याजवळ मासे मृत्युमुखी पडल्याने मृत माशांचा खच पडला आहे. मासे कुजल्याने नदी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, नदीत आलेल्या विषारी काळ्याकुट्ट पाण्याने मृत्युमुखी पडलेले मासे काही मासेमार पोत्यात भरून विक्रीसाठी नेत आहेत. यामुळे खवय्यातून खळबळ उडाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे गम्भीरपूर्वक लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे
कोल्हापूर, इचलकरंजी शहराबरोबरच परिसरातील सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतीतील कारखाने व अन्य उद्योगांचे सांडपाणी, प्रोसेसचे पाणी थेट पंचागंगा नदीत मिसळ असल्याने याचा मोठा फटका शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावांना बसतो. सध्या पंचगंगा नदीत रासायनिक पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले आहेत. तर शिरढोण, हेरवाड या गावाची पेयजल योजना पंचगंगा नदीच्या पाण्यावर आहे. प्रदूषित पाणी आल्याने या गावच्या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून या विषारी पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पाणी पुरवठा बंद करण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या नदीच्या पाण्यावर परिसरातील हजारो एकर शेती आधारित असून या विषारी पाण्यामुळे शेती नापीक होण्याची भिती असल्याने शेतकऱ्यांनी शेतीला पाणी पाजणे बंद केले आहे.
प्रदूषण करणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कठोर कारवाई होत नाही. यामुळे प्रतिवर्षी ग्रामस्थांना दूषित पाण्याचा सामना करावा लागतो. नदीचे प्रदूषण हे सुरूच आहे. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने, प्रदूषण नियंत्रण मंडळा बद्दल नाराजीचा सुर उमटत आहे.