प्रतिनिधी / मुंबई
पंचगंगा नदी प्रदूषणासाठी जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका आणि सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना युनिट सुरू करण्यास मान्यता द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे बैठक झाली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई उपास्थित होते.
दरम्यान, पंचगंगा प्रदुषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांचे पथक संयुक्तरित्या नियमित देखरेख ठेवणार आहे. तसेच दर महिन्याला अहवाल देणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयामार्फतही बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा
पंचगंगा प्रदूषण प्रश्न खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता. दोन दिवसापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बैठक घेण्याची विनंती केली होती. दरम्यान, सोमवारी इचलकरंजी येथील प्रोसेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर तातडीने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीचे आयोजन केले.