शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानकडे सापडलेल्या ड्रग्ज बाबतचा तपास पंचाच्या कृपेने पंचाईत करून ठेवणारा झाला आहे. पंचाने या प्रकरणात तडजोड झाल्याचा खुलासा केल्याने नारकोटिक्स विभागाचे मुंबईतील अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचा निर्णय दिल्लीतून जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आरोप केल्यापासून महाराष्ट्रात जे वादळ उठले होते त्यात आर्यन खान प्रकरणाचा तपास आता पुरता भरकटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मलिक यांनी सुरुवातीपासूनच वानखेडे यांच्यावर एकापेक्षा एक आरोप केले. त्यानंतर त्यांच्या बहिणीवरही आरोप करण्यात आले. मध्यंतरीच्या काळात बॉलीवूडस्टार सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रकरणांमध्ये अमली पदार्थाचे कनेक्शन आढळल्यानंतर अशाच पद्धतीने वादाचे स्वरुप वाढत गेले होते. सुशांत प्रकरणात राजकीय हात असल्याचा आरोप करून बिहार निवडणुकीत संधी शोधण्यात आल्या. सीबीआयला असे कोणतेच पुरावे हाती लागले नाहीत. दरम्यानच्या काळात सुशांत सिंगच्या कुटुंबातूनच आरोप-प्रत्यारोप झाले. त्यातून मग सुशांतला अंमली पदार्थांचा पुरवठा कोण करत होते इथपासून चौकशी सुरू झाली आणि त्यातून अनेक अभिनेते, अभिनेत्री यांची झाडाझडती घेण्यात आली. त्यांचे परस्परांशी झालेले संवाद, त्यांच्या पाटर्य़ा आणि त्यामध्ये अमली पदार्थांचा वापर झाला किंवा नाही याबाबतच्या तपासातून एकापेक्षा एक रंजक माहिती पुढे येऊ लागली. देशभरातील वृत्तवाहिन्यांना चर्वितचर्वण करण्यासाठी प्रदीर्घ काळ या प्रकरणाने खाद्य पुरवठा केला. यातूनच नारकोटिक्स विभागाचे ग्लॅमर वाढत गेले. अनेक अभिनेत्रींना कोर्टाची पायरी चढावी लागली, कस्टडीची वारी घडली. वास्तविक या प्रकरणांमध्ये होणारा तपास आणि त्यात येणारी सेलिब्रिटींची नावे यामुळे आज ना उद्या यामध्ये गोंधळ होणार आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असणारे तपास अधिकारी अडचणीत येणार हे निश्चित दिसत होते. दीपिका पदुकोणची चौकशी आणि रिया चक्रवर्तीची अटक या दरम्यानच्या काळात या विभागाला फार मोठय़ा प्रसिद्धीला आणि माध्यमांकडून विचारल्या जाणाऱया प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यातून या विभागाकडून केलेल्या प्रत्येक कारवाईला मोठी प्रसिद्धी मिळत गेली. आर्यन खान प्रकरणानंतर तर माध्यमांची स्पर्धा इतकी वाढली की त्यांना अपेक्षित असणारी माहिती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या पोहोचवता पोहोचवता या विभागाचे अधिकारी समीर वानखेडे स्वतः अडचणीत सापडले. जावयाच्या कारवाईमुळे अडचणीत आलेल्या नवाब मलिक यांना यानिमित्ताने काही वास्तव पुढे मांडत आहोत असे सांगत संधी साधता आली. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोपसुद्धा झाले. सत्तारूढ भाजपाच्या पदाधिकाऱयांशी संबंधित लोकांना सोडल्याच्या आरोपावरून या वादात फोडणी पडली आणि हे शब्द युद्ध इतके वाढत राहिले की आता त्याच्या चौकशी अधिकाऱयाला चौकशीसाठी दिल्लीला बोलावण्यात आले आहे. मलिक यांनी आरोप करताना हा तपास म्हणजे बॉलीवूडवर दहशत बसवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. मालदीवमध्ये पूर्वीच्या प्रकरणांमध्ये अर्थव्यवहार झाल्याचा आरोप करतानाच वानखेडे यांच्या भगिनी ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेना या विभागाच्या पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून अशी प्रकरणे हाताळली जात असल्याचा आरोप करण्यात आला. मालदीव आणि दुबई दौऱयामध्ये समीर वानखेडे हे देखील त्यांच्या बहिणीसोबत होते असा आरोप करत मलिक यांनी वानखेडे यांच्या बहिणीच्या ट्विटर अकाउंटवरील छायाचित्रे माध्यमांसमोर मांडली. विशेष म्हणजे समीर वानखेडे यांनी या प्रकरणाचा इन्कार केला होता. आता तर हा वाद इतका टोकाला गेला की वानखेडे यांनी विवाह कोणाशी केला, तो विवाह होता की निकाह होता इथपर्यंत माहिती पुरवण्या बरोबरच एका वर्षाच्या आत समीर वानखेडे यांना जेलमध्ये पाठवण्याची भीष्मप्रतिज्ञा नवाब मलिक यांनी केली आहे. पण मलिक यांच्या आरोपांना फार कमी महत्त्व होते. कारण त्यांच्या जावयाशी संबंधितही एक प्रकरण होते. पण आर्यन प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार, पंच प्रभाकर साहील यांनी केलेले आरोप आणि प्रतिज्ञापत्राने वानखेडे यांची पंचाईत झाली! आता वानखेडे यांनी मुंबई सेशन्स कोर्टात स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. त्यात त्यांच्यावर खोटे आरोप झाल्याची आणि एनसीबीने पंचाने साक्ष फिरवल्याचा दावा करणारं वेगळं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. प्रभाकर साहिल यांनी प्रतिज्ञापत्रात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आता या प्रकरणात उतरणार आणि पुन्हा राज्याची आणि केंद्राची यंत्रणा समोरासमोर येण्याची शक्मयता आहे. गेल्यावेळी बिहार पोलिसांनी सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांवर कुरघोडीचा प्रयत्न केला होता. आता नवा तमाशा होण्यापूर्वी दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या आहेत. कारण भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत मुंबई पोलीस चौकशी सुरू करण्याची शक्मयता आहेच! महाराष्ट्र सरकारने आधीच याप्रकरणात महाराष्ट्राची बदनामी सुरु असल्याचा दावा केलेला आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणाला राजकीय रंग अगदी पहिल्यापासून चढलेलाच आहे. भविष्यात या प्रकरणावरून माध्यमांमध्येही दुफळी माजली तर ते आश्चर्यकारक नसेल. मलिक यांनी सांगितलेली पिक्चरची इंटरवल पर्यंतची स्टोरी आहे. पुढची स्टोरी मी सांगणार आहे, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात उडी घेतली आहे. सोबतच नारकोटिक्स विभागाचे दिल्ली कार्यालयही सक्रिय झाले आहे. पंचाने अधिकाऱयांची पंचाईत केली तर राजकीय वादाने तपासाची पंचाईत केली आहे. सगळय़ा राजकीय वादात ड्रग्ज पुरवणाऱया टोळय़ा ज्या केवळ मुंबई नव्हे तर संपूर्ण देशात आणि जगात पसरल्या आहेत त्या टोळय़ा केंद्र आणि राज्य सरकारातील सत्ता स्पर्धेची गंमत बघत बसल्या आहेत. जनतेची पंचाईत मात्र वेगळीच आहे!
Previous Articleगोलंदाज प्रशिक्षकपदासाठी पारस म्हांब्रे इच्छुक
Next Article आयुषमान भारत आरोग्य सुविधा अभियानाचा शुभारंभ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.