प्रतिनिधी /पणजी
राज्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका जून महिन्यात घेण्यात येतील, असा पुनरुच्चार पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केला. पंचायतींच्या प्रभागांची पुनर्रचना राज्य निवडणूक आयोग करीत आहे आणि ती प्रक्रिया योग्य वेळी पूर्ण होईल, अशी माहिती पत्रकारांशी बोलताना त्यांनी दिली.
राज्यातील 187 ग्रामपंचायतींची मुदत पुढील महिन्यात संपुष्टात येत असून जूनच्या साधारणतः पहिल्या आठवडय़ात त्यासाठी निवडणुका घेण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर राज्यातील पंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली तरी त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलेली आहे.