मुख्यमंत्री, पंचायतमंत्री यांच्यात होणार चर्चा, सरकारने उशीर केल्याचा इच्छुकांचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांची आज सोमवार 16 मे रोजी महत्वाची बैठक होणार असून त्यात पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
ग्राम पंचायत निवडणूक सुमारे 5 महिने पुढे ढकलण्यात येणार असून ती दिवाळीपूर्वी घेण्याचे ठरविण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रभागांचे आरक्षण झाले नसल्याचे सरकारचे मत बनले असून आरक्षणाची फाईल पुन्हा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्याची तयारी सरकारने केली आहे. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी होणारी ही बैठक महत्वपूर्ण आहे.
186 पंचायतींची मुदत संपणार
राज्यातील 186 पंचायतींची मुदत येत्या 19 जून 2022 रोजी संपत आहे. तो पर्यंत पंचायत निवडणूक न झाल्यास निवडणूक होईपर्यंत सर्व पंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. आजच्या बैठकीत हे सारे निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले.
तयारीअभावी निवडणूक लांबणीवर
यापूर्वी 4 जून ही तारीख पंचायत निवडणूक मतदानासाठी ठरविण्यात आली होती नंतर 11 ते 15 जूनपर्यंत निवडणूक होईल असे सरकारतर्फे सांगण्यात आले परंतु अजून निवडणूक प्रक्रिया, सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात सरकारला अपयश आले आहे. आवश्यक ती तयारी सरकारने अगोदर न केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे आता इच्छूक उमेदवार, मतदार यांच्यात निवडणुकीबाबत शंका निर्माण झाली असून त्याचे निरसन आजच्या मुख्यमंत्री, पंचायतमंत्री यांच्या बैठकीत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
सरकारला निवडणूक घ्यायची नाही काय?
पावसाळी मोसम 15 दिवसांवर म्हणजेच ऐन तोंडावर येऊन ठेपलेला असल्याने जून महिन्यात पंचायत निवडणूक घेणे अडचणीचे असल्याचा साक्षात्कार आता सरकारला झाला आहे. पंचायत निवडणूक जून महिन्यात घायची आहे, हे सरकाला माहीत नव्हते काय, असा सवाल इच्छुकांकडून उपस्थित केला जात आहे. सरकारने कोणतीच तयारी केली नाही, याचा अर्थ सरकारला ही निवडणूक घ्यायचीच नाही, असे जनतेने समजायचे काय, असा सवाल पंच सदस्यांनी उपस्थित केला आहे.
पंचायत निवडणुकीसाठी कोणते नियोजनच नव्हते. वॉर्ड पुनर्रचना तसेच आरक्षणाचे कामही आयोगाने उशिरा सुरु केले. त्यामुळे 4 जून ही तारीख ठरवूनही त्या दिवशी निवडणूक घेणे शक्य नसल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत विशेष कोणता निर्णय घेतला जाईल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.