कोरोना प्रतिबंधक नियमावलीकडे दुर्लक्ष करणे भोवले
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान सेवा बजावलेल्या दोन हजारहून अधिक कर्मचारी-अधिकाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या मृतांमध्ये जवळपास एक हजार शिक्षकांचा समावेश असल्याचे स्पष्टीकरण शिक्षक संघटनेने दिले आहे. तसेच मृत शिक्षकांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये इतकी भरपाई देण्याची मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच निवडणुकीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगसह सर्वच नियमांची पायमल्ली झाल्याचा दावाही करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 15 एप्रिल ते 5 मे या कालावधीत पंचायत निवडणुकांनंतर धक्कादायक बातमी समोर आली आहे. या निवडणुकीत कर्तव्यावर गेलेल्या दोन हजारहून अधिक जण कोरोना संक्रमणामुळे मरण पावले आहेत असा दावा उत्तर प्रदेश कर्मचारी संघटना संयुक्त समितीने केला आहे. मृतांमध्ये विविध विभागांचे कर्मचारी आणि जवळपास एक हजार शिक्षकांचा समावेश असल्याचे संघटनेचे अध्यक्ष हरी किशोर तिवारी यांनी सांगितले. उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिनेशचंद्र शर्मा यांनीही याला दुजोरा दिला आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या 706 शिक्षकांची यादी आठ दिवसांपूर्वी तयार केली गेली आहे. या सर्व शिक्षकांची डय़ुटी पंचायत निवडणुकीसाठी लावण्यात आली होती. यासंबंधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दहा पानांचे लेखी निवेदन पाठविण्यात आले आहे. शिक्षक संघटनांच्या मागण्यांसह शिक्षकांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असे लेखी म्हणणे मुख्यमंत्र्यांना कळविण्यात आले आहे.