वार्ताहर, प्रतिनिधी/ निपाणी, चिकोडी
राज्यातील दुसऱया टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर बुधवारी मतमोजणी होणार असून मतमोजणीची वेळ जवळ येईल तशी उमेदवारांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. उमेदवारांचे लक्ष आता निकालाकडे लागून राहिले आहे. जिल्हय़ात दोन टप्प्यात ग्रा. पं. निवडणुका पार पडल्या होत्या. निपाणी, चिकोडी, हुक्केरी, कागवाड, अथणी, गोकाक, रामदुर्गसह अन्य तालुका ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून प्रशासन यासाठी सज्ज आहे.
निपाणी तालुक्यात 27 ग्रा.पं. साठी 84.77, चिकोडी तालुक्यात 35 ग्रा. पं. साठी 84.49, हुक्केरी तालुक्यातील 52 ग्रा. पं. साठी 84.30, गोकाक तालुक्यातील 32 ग्रा. पं. साठी 80.08, मुडलगीतील 20 ग्रा. पं. साठी 82.23, रामदुर्ग तालुक्यातील 33 ग्रा.पं. साठी 82.55, अथणीत 41 ग्रा.पं. साठी 82.64, कागवाडमधील 8 ग्रा.पं. साठी 80.94 तर रायबाग तालुक्यातील 33 ग्रा. पं. साठी 82.49 टक्के मतदान दोन टप्प्यात पार पडले होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्ते आणि उमेदवार गावपातळीवर आकडेमोड करण्यात गुंतताना जय-पराजयाचा अंदाज बांधण्यात गुंग होते. दरम्यान बुधवारी मतमोजणी होणार असल्याने कार्यकर्त्यांसह उमेदवार आणि ग्रामस्थांची उत्कंठा शिगेला पोहचली असून हा पूर्णविराम अंतिम निकालातून स्पष्ट होणार आहे.
निपाणी तालुक्यात 483 जागांचे ठरणार भवितव्य
निपाणी तालुक्यातील 27 ग्रा. पं. साठी संग्राम लागला आहे. यातील काही जागा बिनविरोध झाल्या असून एकूण 483 जागांसाठी 1228 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निपाणी तालुक्यात बहुतांशी ठिकाणी भाजप आणि काँग्रेस पुरस्कृत आघाडय़ांमध्ये तुल्यबळ लढत लागली आहे. तर काही गावांमध्ये अपक्षांनीही उडी घेतल्याने अनेक ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
चिकोडी तालुक्यात 1628 उमेदवार
चिकोडी तालुक्मयात 35 ग्राम पंचायती असून त्यापैकी जनवाड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर उर्वरित 35 ग्रामपंचायतीसाठी 27 डिसेंबर रोजी मतदान झाले आहे. 625 उमेदवार निवडण्यात येणार असून एकूण 1628 उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक ठिकाणी बहुरंगी लढती लागल्या आहेत. नणदीवाडीसारख्या छोटय़ा वाडीतील एकमेव असलेल्या वॉर्डात एका सदस्याच्या जागेसाठी चार-चार उमेदवार रिंगणात आहेत. तिथे चौरंगी लढत लागली आहे. मतदानानंतर दोन दिवस उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतविभागणीची आकडेमोड केली आहे. आता प्रत्यक्ष मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्यामुळे त्यांची धाकधुक व उत्सुकता वाढली आहे.
धाकधूक वाढली, झोप उडाली
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील तळागाळातील नागरिक ते उमेदवारांपर्यंतचे सर्व घटक ढवळून निघाले आहेत. प्रत्येकाला निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. निवडणुकीत इतक्मया जोमाने व चुरशीने प्रचार केला, चुरशीने मतदान करून घेतले. आता या घेतलेल्या कष्टाचे फळ विजयोत्सव साजरा करून पूर्णत्वास जावे अशी उमेदवारांची व कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मतमोजणीची घटका जशी जवळ येत जाईल तशी उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तसेच राजकीय नेत्यांच्या झोपाही उडाल्या आहेत. या निवडणुकीमुळे लोकमनावर कोणत्या पक्षाचे प्रतिबिंब उमटले आहे याचा लोकप्रतिनिधींना अनुभव मिळणार आहे.
चौकट करणे…
कोरोनाचा धोका संपला नाही…
निवडणुकीच्या प्रक्रियेत मतमोजणी महत्त्वाची असून त्यानंतर गावा-गावात विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी चिकोडीत धाव घेणार आहेत. मतमोजणीच्या निमित्ताने तालुका ठिकाणांना जत्रेचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे पोलिसांवर त्याचा अनावश्यक ताण पडणार आहे. पण समर्थकांनी कोरोनाचा धोका अद्याप संपला नसल्यामुळे उत्साहाच्या भरात अतिउत्साही होऊन समाजात अशांतता निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.