नव्या नेत्याच्या निवडीसाठी काँग्रेस हायकमांडची कसरत – अमरिंदर सिंग यांच्या पुढील वाटचालीबाबत औत्सुक्य
चंदिगढ / वृत्तसंस्था
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह उजेडात आले असून आता नव्या नेत्याच्या निवडीसाठी हायकमांडची कसरत सुरू झाली आहे. आगामी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुनील जाखड, प्रताप बाजवा आणि सुखजिंदर रंधवा यांची नावे आघाडीवर आहेत. दरम्यान, आपल्या पुढील वाटचालीबाबत सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मौन बाळगले असून त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा हा पंजाबमधील राजकीय भूकंप मानला जात आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू समर्थक 40 आमदारांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आवाज उठविल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. तथापि, हायकमांडने त्यांना राजीनामा देण्याची सूचना केल्याचीही चर्चा आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास राजभवनात राज्यपालांची भेट घेत राजीनामा सादर केला. त्यांनी सादर केलेला राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असल्याने आता पंजाबमध्ये नवे मंत्रिमंडळ तयार करावे लागणार आहे.
नव्या नेत्याच्या निवडीसाठी काँग्रेसने सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक चंदिगढ येथील काँग्रेस भवनात सायंकाळी 5.30 च्या सुमारास झाली. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि अन्य आमदार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. कॅप्टनच्या राजीनाम्यानंतर आता नवीन मुख्यमंत्री चेहरा निवडण्यावर मंथन झाले. काँग्रेसच्या आमदारांनी नवीन मुख्यमंत्री निवडण्याचा निर्णय पक्ष हायकमांडवर सोडला आहे.
हायकमांडबाबत व्यक्त केली नाराजी
राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली. राजीनाम्याचा निर्णय आपण आज सकाळीच घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच आपण काँग्रेस अध्यक्षांनाही राजीनाम्याबाबत माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीमध्ये आमदारांची तिसऱयांदा बैठक बोलावली गेली असून गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी बैठक आहे. सरकार न चालवू शकल्याचा संशय माझ्यावर व्यक्त करण्यात आला. हायकमांडकडून झालेला हा माझा अपमान आहे असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. पक्षनेतृत्त्वावर आरोपांच्या फैरी झाडल्यामुळे आता कॅप्टन भाजपमध्ये सामील होणार असल्याचीही चर्चा आहे. काँग्रेस हायकमांडच्या भूमिकेमुळे कॅप्टन यांच्या निकटवर्तियांनीही सोयीस्कर मौन बाळगले आहे.
सिद्धूंना केले ‘क्लीन बोल्ड’
मी मागील साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री होतो. या काळात मला साथ देणाऱया साथीदार-समर्थकांशी बोलून मी पुढील निर्णय घेईन. सहकाऱयांशी बोलल्यानंतरच आम्ही भविष्यातील राजकारण ठरवू, असे सध्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सिद्धूंवर तोफ डागताना त्यांनी ‘जी व्यक्ती एक मंत्रालय चालवू शकत नाही ती सरकार काय चालवणार?’ असा एकच फटका मारत सिद्धूला ‘क्लीन बोल्ड’ केले.
पुढील वाटचालीबाबत ‘गुगली’
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग कोणत्या पक्षात जाणार?, आपला स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करणार?, असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. तथापि, सध्या आपण काँग्रेसमध्येच राहणार असून भविष्यात राजकीय पर्याय खुले असल्याचेही कॅप्टन म्हणाले. तथापि, ‘त्यांना’ ज्याच्यावर विश्वास असेल त्याला मुख्यमंत्री बनवावे अशी ‘गुगली’ कॅप्टन यांनी टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तरीही पंजाबमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसमधील दुफळी चव्हाटय़ावर
2022 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये राजकीय वातावरण गरम आहे. त्यात पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याचे चित्र असून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग विरुद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे थेट दोन गट पडले आहेत. नवज्योत सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष बनवल्यापासून काँग्रेसमधील गोंधळ वाढला होता. विशेषतः कॅप्टनच्या विरोधी गटाने दुसऱयांदा आघाडी उघडली आहे.