सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय : काँग्रेस आमदाराचा दावा
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबमध्ये मागील काही काळात झालेल्या घटना पाहता आता अमृतसरमध्ये 15-17 मार्च आणि 19-20 मार्च या कालावधीत होणाऱ्या जी-20 च्या बैठका रद्द होण्याची शक्यता आहे. अमृतसरमध्ये होणाऱ्या या बैठका रद्द करण्यात आल्याचे समजते. परंतु याप्रकरणी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगणे पसंत केले आहे, तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे खासदार गुरजीत औजला आणि आमदार सुखपाल सिंह खेहरा यांनी ट्विट करत या बैठका रद्द झाल्याची माहिती दिली आहे.
सुमारे एक आठवड्यापूर्वी केंद्राकडून राज्य सरकारला आढावा घेण्यास सांगण्यात आले होते. परंतु आता या बैठकांचे आयोजन आता रद्द करण्यात आले आहे. परंतु यासंबंधीचा अधिकृत आदेश शहर प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. तर दुसरीकडे रविवारी सकाळी अमृतसरच्या काही हॉटेलमालकांना जी-20 बैठकांशी संबंधित बुकिंग रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर अद्याप राज्यातील आम आदमी पक्षाच्या सरकारने प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे.
सुरक्षा यंत्रणांची सूचना
सुरक्षा यंत्रणांच्या सुचना मिळाल्यावर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. अजनाला येथे झालेली घटना आणि तरनतारनच्या सरहाली पोलीस स्थानकावरील आरपीजी हल्ला पाहता सुरक्षा यंत्रणांनी जी-20 ची बैठक अमृतसर येथे आयोजित न करण्याची सूचना केंद्र सरकारला केली होती.
अजनालामुळे राज्य सरकार अडचणीत
काही दिवसांपूर्वी अमृतसरच्या अजनाला पोलीस स्थानकावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या घटनेच्या तीन दिवसांनीच केंद्र सरकारने सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्याचा निर्देश जिल्हा प्रशासनाला दिला होता. आढाव्यासाठीचा अर्ज राज्य सरकारकडे पोहोचताच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीत धाव घेत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर राज्यात सुरक्षा दलाच्या अतिरिक्त तुकड्या पाठविण्यात आल्या होत्या. तरीही अखरेच्या क्षणी बैठका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.