चकमक अद्याप सुरूच : एकूण 5 दहशतवादी असल्याचा संशय
@ वृत्तसंस्था / तरनतारन
पंजाबच्या तरनतारन जिल्हय़ात सोमवारी सकाळी गुन्हेगार (दहशतवादी असल्याचा संशय) आणि पोलीस यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत एक संशयित मारला गेला असून दोन जणांना पकडण्यास यश आले होते. परंतु अटकेनंतर काही वेळताच दोन्ही गुन्हेगारांच्या तोंडातून फेस येत त्यांचा मृत्यू झाला आहे. दोघांनीही विषप्राशन केल्याचा संशय आहे. तर दोन गुन्हेगार अद्याप माही पॅलेसमागील एका घरात लपले असून त्यांच्याकडून गोळीबार सुरू आहे.
सकाळी 11 वाजता शस्त्रधारी पाच गुन्हेगार माही पॅलेसनजीक दिसून आले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस पोहोचताच गुन्हेगारांनी गोळीबार केला आहे. पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत एक गुन्हेगार मारला गेला तर दोन जणांना पकडण्यात आले होते.
16 ऑक्टोबर रोजी पट्टी येथे शौर्यचक्र विजेते बलविंदर सिंग संधू यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दोन मुख्य आरोपी गुरजीत आणि सुखजीत सिंग यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील जम्मू-काश्मीरच्या तीन जणांसह दिल्ली पोलिसांनी 9 डिसेंबर रोजी अटक केली होती. या सर्वांना तरनतारन जिल्हय़ातील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर ही चकमक घडली आहे. तसेच चकमकीचे ठिकाण न्यायालयापासून केवळ दीड किलोमीटर अंतरावर आहे. अशा स्थितीत दोन्ही आरोपींना मुक्त करण्याच्या उद्देशाने हे दहशतवादी पोहोचल्याचा संशय आहे.