काँग्रेस नेते राहुल गांधींचे वक्तव्य
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंजाबच्या पतियाळा जिल्ह्य़ातील राजपुरा येथे प्रचारसभा घेतली आहे. या सभेत बोलताना त्यांनी आम आदमी पक्षाला लक्ष्य केले आहे. मी खोटी आश्वासने देत नाही, जे बोलतो ते सत्य असते आणि विचारपूर्वक बोलत असतो. हेच मला शिकविण्यात आले आहे. पंजाबसाठी सर्वात आवश्यक येथील शांतता आहे. पंजाब म्हणजे काही रासायनिक प्रयोगशाळा नाही, जेथे प्रयोग केले जावेत. याचमुळे काँग्रेसला पंजाबची माहिती आहे आणि येथे शांतता प्रस्थापित करू शकते. उर्वरित पक्ष पंजाबमध्ये आग लावण्यासह राज्याला उद्ध्वस्त करतील. काँग्रेस पंजाबमध्ये प्रत्येक धर्माला सोबत घेऊन चालत असल्याचे राहुल म्हणाले.
काँग्रेसचे हजारो कार्यकर्त्यांनी बलिदान केले आहे. आम्ही अहिंसा समजतो, प्रसंगी मरण पत्करू परंतु पंजाबमधील शांतता ढळू देणार नाही. प्रत्येक व्यक्तीमागे एखादी शक्ती असते. अशाचप्रकारे नरेंद्र मोदींमागे कुठली शक्ती आहे हा प्रश्न विचारा. त्यांच्यामागे गरीब लोकांची शक्ती नव्हे तर त्यांच्या पाठिशी मोठय़ा शक्ती असल्याचे विधान त्यांनी केले आहे.
शेतकरी एक वर्षापर्यंत रस्त्यांवर ठाण मांडून होते. परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. देशातील 3-4 अब्जाधीश नरेंद्र मोदींच्या माध्यमातून शेतकऱयांच्या हातातील पैसा हिरावू पाहत आहेत. अरविंद केजरीवाल देखील याचा मार्गावर आहेत. ते देखील स्वतःच्या मागील शक्तींद्वारे पंजाबला उद्ध्वस्त करू पाहत असल्याचा दावा राहुल यांनी केला.
मागील काही काळापासून पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने याचा लाभ पंतप्रधानांच्या मागे असणाऱया शक्तींना मिळतोय. पंतप्रधानांमागील शक्ती देशाला नुकसान पोहोचवत आहेत असा आरोप त्यांनी केला. पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या समस्येबद्दल बोललो तेव्हा सुखबीर बादल आणि भाजपने माझी थट्टा उडविली होती. कोरोना काळात भारताला नुकसान होईल आणि लाखो लोक मृत्युमुखी पडणार असल्याचे म्हटले होते. भारत सरकार आणि दिल्ली सरकारला तयारी करता यावी म्हणून हे विधान केले होते. तरीही माझी थट्टा उडविण्यात आल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
कोरोना संकट हाताळण्यास दिल्ली अपयशी
दिल्लीत सर्वप्रथम मोहल्ला क्लीनिक माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी सुरू केले होते. आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात मोहल्ला क्लीनिक कुठे गायब झाले होते? कोरोना काळात दिल्ली सरकार अपयशी ठरले आहे. पंजाबने कोरोना संकटाला समर्थपणे मुकाबला केला आहे. नोटाबंदीनंतर काळा पैसा समाप्त होईल असा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. परंतु काळा पैसा अद्याप मोठय़ा प्रमाणावर असल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
अमरिंदर यांच्याबद्दल टिप्पणी
कॅप्टन अमरिंदर सिंह आणि भाजप यांच्यात साटेलोटे असल्याचे समजल्यावर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले होते. पंजाबच्या विजेचा प्रश्न सोडवा असे त्यांना मी सांगितले होते, तेव्हा त्यांनी सरकारने कंपन्यांशी करार केल्याचे कारण पुढे केले होते. विजेच्या समस्येबद्दल चरणजीत चन्नी यांच्याशी बोलल्यावर त्यांनी हा मुद्दा सोडविला. काँग्रेस सरकार पंजाबमधील मक्तेदारी मोडीत काढणार आहे. बस, केबल टीव्ही, वाळूची मक्तेदारी संपविण्यात येईल. बससाठीचे परवाने तरुण-तरुणींना दिले जातील. सरकारी कार्यालयांच्या 170 सेवा इंटरनेटद्वारे लोकांच्या हातात उपलब्ध होतील. पंजाबमध्sय महामंडळांमधील पदे आमदारपुत्रांना नव्हे तर काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली जाणार आहेत. महिलांसाठी वर्षात 8 सिलिंडर मोफत दिले जातील असे आश्वासन राहुल यांनी दिले आहे.