ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
काँग्रेसच्या गोटात गेले काही दिवस कमी – जास्त प्रमाणात राजकिय घडामोडी सुरुच आहेत. यापुर्वी राजस्थान काँग्रेसचे वाद दिल्लीपर्यंत पोहोचले होते. या घडामोडी थंडावल्या तोवर पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवाय संध्याकाळी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवीन नेत्याची निवड करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जर त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवले गेले तर ते पक्षही सोडतील असे भाकित यापुर्वीच केले आहे.
आगामी पंजाब विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात मोठी खलबते घडत असून पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेले शीतयुद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. सर्व प्रयत्न करूनही अमरिंदर सिंग आणि त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील राजकीय शितयुद्ध संपलेले नाही. शनिवारी होणाऱ्या आमदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी याबाबत सोनिया गांधीकडे भाष्य केलं आहे. यावर अमरिंदर सिंग काय निर्णय घेतात यावरच काँग्रेस हायकमांड आपला निर्णय घेणार आहे.तर पंजाब मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.