शिरोमणी अकाली दल, काँग्रेस अन् आपसाठी गावांमध्ये नवे आव्हान, कॅप्टननाही झकटा, शहरी क्षेत्रात भाजपला लाभ
सिंघू सीमेवर आंदोलनाच्या मदतीने शेतकऱयांनी आता पंजाब विधानसभेत पोहोचण्याचा मार्ग पकडला आहे. पंजाबच्या 25 शेतकरी संघटना ‘संयुक्त समाज मोर्चा’ तयार करून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. शेतकऱयांच्या राजकारणमुळे अन्य पक्षांवर कुठला प्रभाव पडणार हा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. शेतकऱयांचे प्रमाण गावांमध्ये अधिक असल्याने ग्रामीण पातळीवर शिरोमणी अकाली दल, काँग्रेस आणि आम आदमी पक्षासमोरील आव्हान वाढले आहे.
तर शेतकऱयांच्या निर्णयामुळे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना झटका बसला असला तरीही शहरांमध्ये भाजप आघाडीला लाभ मिळू शकतो. पंजाबमध्ये भाजप हा प्रामुख्याने शहरी भागांमध्ये सक्रीय आहे. तर कॅप्टन यांना शहरी भागात चांगला पाठिंबा आहे. अशा स्थितीत शेतकऱयांच्या निर्णयामुळे सर्वाधिक चिंता अकाली दल आणि काँग्रेसला आहे.
कुणासमोर कुठले आव्हान…
शिरोमणी अकाली दल ः अकाली दल स्वतःला पंथक पक्ष म्हणवून घेतो आणि याची मुख्य मतपेढी ग्रामीण शीख आहे. शेतकरी निवडणूक लढवत असल्याने गावांमध्ये अकाली दलाची मतपेढी विखुरली जाणार आहे. कृषी कायद्यांवरून अकाली दलाची भूमिका राज्यात वादग्रस्त ठरली आहे. सुखबीर सिंह बादल यांनी भाजपसोबत असलेली आघाडी संपुष्टात आणली असली तरीही शेतकऱयांचे मन वळविणे कितपत जमेल याबद्दल संशय आहे. तर भाजपसोबतचे नाते संपुष्टात आणल्याने अकाली दलाला शहरी मतपेढीकरता संघर्ष करावा लागतोय.
काँग्रेस ः प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या जोडीसाठी हा मोठा झटका आहे. पक्षसंघटन आणि सरकारमध्ये शीख चेहऱयामुळे पूर्वीचे पक्षाचे जातीय समीकरण कोलमडले आहे. काँग्रेसकडे शहरी क्षेत्रात कुठलाच प्रभावी चेहरा नाही. काँग्रेस पूर्वी आंदोलन आणि त्यानंतर किसान स्मारक, कर्जमाफी, भरपाईच्या मुद्दय़ावरून शेतकऱयांना आकर्षित करू पाहत होता, पण हे मुद्दे आता पक्षाच्या हातात राहिले नाहीत.
आप ः आम आदमी पक्षाला ग्रामीण भागातच अधिक पाठिंबा आहे. मागील निवडणुकीत आम आदमी पक्षाला ग्रामीण मतदारसंघांमध्येच लक्षणीय यश मिळाले होते. किसान मोर्चा स्वतः निवडणूक लढविणार असल्याने ‘आप’ला हा मोठा झटका आहे. परंतु किसान मोर्चा आणि आम आदमी पक्ष यांच्यात आघाडी झाल्यास ग्रामीण क्षेत्रांमध्ये ‘आप’साठी ती लाभदायक ठरू शकते.
भाजप ः शेतकऱयांचा राजकारणातील प्रवेश भाजपसाठी काहीअंशी नुकसानीचा तसेच लाभाचा देखील आहे. शेतकरी प्रारंभापासूनच राजकारण करत होते असे भाजप आता उघडपणे म्हणू शकणार आहे. हा मुद्दा शहरी वर्गासमोर मांडला जाणार आहे. तर शेतकऱयांचे अस्तित्व शहरांमध्ये फारसेच नसल्याने भाजप याचा लाभ उचलू शकतो. तर शेतकऱयांच्या राजकारणातील उडीमुळे आंदोलनाचा मुद्दा कायम राहणार असल्याने भाजपला नुकसान होऊ शकते.
कॅप्टन अमरिंदर सिंह ः पंजाब लोककाँग्रेस पक्ष स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना गावांसह शहरांमध्येही चांगला पाठिंबा प्राप्त आहे. कॅप्टन यांचे शेतकरी नेत्यांसोबत असलेले संबंधही चर्चेत राहिले आहेत. शेतकरी संघटना कॅप्टन यांना लाभ मिळवून देतील अशी चर्चा होती. परंतु आता शेतकरीच स्वतः निवडणूक लढवत असल्याने कॅप्टन यांना झटका बसला आहे. भाजपसोबत आघाडीमुळे कॅप्टन यांना शहरी क्षेत्रात लाभ मिळणार आहे.
77 जागांवर ग्रामीण मतपेढीचा दबदबा
पंजाबमध्ये शेतकऱयांचा राजकारणातील प्रवेश महत्त्वपूर्ण आहे कारण 117 जागांपैकी 77 जागांवर ग्रामीण मतपेढीचा दबदबा आहे. यातील 26 मतदारसंघ पूर्णपणे ग्रामीण आहेत. तर 51 मतदारसंघ निमशहरी आहेत. दोन्ही ठिकाणी शेतकरीच प्रभावी आहेत. ग्रामीण मतदारसंघांमध्ये सक्रीय पक्षांसाठी ही चिंतेची बाब आहे. पंजाबमधील उर्वरत 40 शहरी मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करत भाजप नव्या सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा दावा करत आहे.