आम आदमी पक्षाचे आश्वासन – घराचे जुने वीज बिल माफत अन् 24 तास वीजपुरवठा
वृत्तसंस्था / चंदीगड
आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱया विधानसभा निवडणुकीकरता दिल्लीसारखीच योजना जाहीर केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चंदीगडमध्ये एक पत्रकार परिषद घेत पंजाबच्या जनतेला 3 मोठी आश्वासने दिली आहेत. प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट मोफत वीज, घराची जुनी वीज बिले माफ आणि 24 तास वीजपुरवठा अशी तीन आश्वासने देत आम आदमी पक्षाने पंजाब निवडणुकीकरता आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
गरीबांच्या विजेची बिले 70 हजार रुपयांपर्यंत येत आहेत. गरीबांचा दोष नसताना त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. पण आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास गरीबांना सन्मान देत वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यात येईल. घराची जुने विजेची बिले माफ करण्यात येतील. 300 युनिट मोफत विजेमुळै 80 टक्के लोकांचे विजेचे बिल शून्य होणार आहे. ही केजरीवालची गॅरंटी आहे, कॅप्टनची आश्वासने नाहीत. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेली आश्वासने 5 वर्षांमध्ये पूर्ण झालेली नाहीत. पण आमचे सरकार सत्तेवर येताच 300 युनिट वीज आणि जुनी विजेची बिले माफ होणार आहेत. 24 तास वीज पुरवठा करण्यास काही काळ लागणार असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे. पंजाबसाठी ही नवी पहाट असल्याचे केजरीवालांनी यापूर्वी ट्विट करत म्हटले होते.
पंजाबात महागाईचे संकट
दिल्लीत आम्ही प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज मोफत उपलब्ध करत आहोत. दिल्लीतील महिला आनंदी आहेत. तर पंजाबच्या महिला महागाईमुळे नाराज आहेत. आम आदमी पक्ष पूर्ण पंजाबमध्ये 300 युनिट वीज मोफत देणार असल्याचे केजरीवालांनी म्हटले आहे.
काँग्रेसही सक्रीय
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर मोफत वीज देण्याच्या आश्वासनासाठी दबाव आणल्याचे समजते. विशेषकरून ग्रामीण भागांमध्ये मोफत वीज देण्यात यावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने वीज आणि महागाईवरून स्वतःची रणनीति आखली आहे. पंजाबमध्ये वीजेचे दर अधिक असल्याने तीव्र विरोध सुरू झाला आहे.
पंजाब सरकारवर गंभीर आरोप
पंजाबमध्ये सरकार आणि वीज कंपन्या यांच्यात साटलोट असल्याने याचा फटका तेथील सर्वसामान्य लोकांना बसत आहे. पूर्ण देशात वीजेचा दर पंजाबमध्येच सर्वाधिक आहे. प्रत्यक्षात पंजाबमध्ये वीजेची निर्मिती होत असल्याने याचा दर इतका अधिक का? वीज कंपन्या आणि सत्ताधारी यांच्यात साटलोटं असल्यानेच हा प्रकार घडत असल्याचा आरोप केजरीवालांनी केला आहे.
पुढील वर्षी निवडणूक
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. 3 नवीन कृषी कायद्यांवरून शिरोमणी अकाली दलाने भाजपसोबतची आघाडी संपुष्टात आणली आहे. दुसरीकडे सत्तारुढ असलेल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग स्वतःच्या बळावर पक्षाला विजय मिळवून देऊ शकतात असे मानले जाते, पण दुसरीकडे काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्याच विरोधात मोर्चा उघडला आहे. काँग्रेसमधील उलथापालथ आणि अकाली दल-भाजप आघाडी मोडल्याने आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये मोठी संधी दिसत आहे.