डीजीपी अन् एजीला त्वरित हटवा, अन्यथा तोंड दाखविता येणार नाही
वृत्तसंस्था/ लुधियाना
पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱया नवज्योत सिंह सिद्धू यांनी राज्यातील नव्या चन्नी सरकारवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. यावेळी सिद्धू यांच्या टार्गेटवर पोलीस महासंचालक (डीजीपी) इक्बालप्रीत सहोता आणि ऍडव्होकेट जनरल (एजी) एपीएस देयोल होते. त्यांची नियुक्ती करून पंजाब सरकारने अमली पदार्थांचे व्यसन आणि धर्मग्रंथाच्या अवमान प्रकरणातील पीडितांच्या जखमांवर मीठ चोळल्याचे विधान सिद्धू यांनी केले आहे.
या दोन्ही अधिकाऱयांना कुठल्याही स्थितीत बदलावे लागणार नाही, अन्यथा आम्ही पंजाबच्या लोकांना तोंड दाखवू शकणार नसल्याचे सिद्धू म्हणाले. सिद्धू सातत्याने या दोन्ही अधिकाऱयांना हटविण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत. या अधिकाऱयांच्या नियुक्तीनंतचर सिद्धू यांनी राजीनामा दिला होता.
धर्मग्रंथ अवमान प्रकरणात न्याय आणि अमली पदार्थांच्या तस्करीत मुख्य आरोपीच्या अटकेवरूनच 2017 मध्ये पंजाबमध्ये सरकार आले होते. याप्रकरणी सरकार अपयशी ठरले आहे. याच कारणामुळे यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना (कॅप्टन अमरिंदर सिंह) हटविण्यात आल्याचे सिद्धू यांनी म्हटले आहे. अशाप्रकारचे विधान करून सिद्धू यांनी चन्नी सरकारलाच अडचणीत आणले आहे.
सिद्धूंची नाराजी कायम
नवज्योत सिद्धू अद्याप सरकारवर नाराज आहेत. सिद्धू यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी 3 दिवसांपूर्वी पंजाब भवनात बैठक केली होती. तेथे सहमतीचे सूत्र निश्चित करण्यात आले होते. ऍडव्होकेट जनरल एपीएस देयोल यांच्याकडून अवमानाचे खटले काढून घेण्यात आले होते. मोठे निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल. या नवज्योत सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि पक्षश्रेष्ठींच्यावतीने महासचिव किंवा पंजाबचे प्रभारी सामील असतील असे ठरले होते. पण सिद्धू अद्याप डीजीपी आणि महाधिवक्त्यांना हटविण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
आक्रमक भूमिका
सिद्धू यांनी शनिवारी देखील आक्रमक भूमिका दाखवून दिली होती. पदावर असलो किंवा नसलो तरीही राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांच्यासोबत उभा राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सिद्धू यांच्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचे मानले जातेय. यावरून देखील सिद्धूंच्या नाराजीत भर पडल्याचे मानले जात आहे. पक्षशेष्ठींनी राजीनामा नामंजूर केल्यास सिद्धू पुन्हा पदभार स्वीकारू शकतात. पण राजीनामा स्वतःच मागे घेतल्यास राजकीय प्रतिष्ठेला धक्का बसण्याची भीती सिद्धू यांना सतावू लागली आहे.