शाळांमध्ये संस्कृतचे धडे देण्यात येणार ः रामायण, महाभारत अन् भगवद्गीतेवर अध्ययन केंद्र
वृत्तसंस्था / जालंधर
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मतपेढीने काँग्रेसचे टेन्शन वाढविले आहे. राज्य सरकार आणि पक्ष संघटनेत शीखधर्मीयांचा वरचष्मा आहे. काँग्रेसमध्ये कुठलाच दिग्गज हिंदू चेहरा समोर आलेला नाही. अशा स्थितीत मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनीच ही जबाबदारी हाती घेतली आहे. पंजाबच्या शासकीय शाळांमध्ये संस्कृत शिकविण्यात येईल. पर्यायी विषय म्हणून संस्कृतचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार असल्याची घोषणा चन्नी यांनी केली आहे.
याचबरोबर रामायण, महाभारत आणि श्रीमद् भगवद्गीतेवर अध्ययन केंद्रांची निर्मिती करण्यात येईल. एवढेच नाही तर फगवाडा येथील खाटी गाव हे भगवान परशुराम यांचे तपोस्थळ आहे. तर मुख्यमंत्री चन्नी हे स्वतः देखील संस्कृत शिकून महाभारतावर पीएचडी करणार आहेत.
काँग्रेसच्या चिंतेची कारणे
-पंजाबमध्ये 38.49 टक्के हिंदू मते आहेत. 19 टक्के जट्टशिख मतांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नवज्योत सिंग सिद्धू यांना देण्यात आले आहे. 32 टक्के दलित मतपेढीसाठी अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व मुख्यमंत्री चरणजीत चन्नी हेच करू शकतात. पण हिंदू मतपेढीसाठी काँग्रेसकडे कुठलाच प्रबळ नेता नाही.
-पंजाबमध्ये काँग्रेसचा मोठा हिंदू चेहरा माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड आहेत. पण ते पक्षावर नाराज होऊन घरात बसले आहेत. पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश चौधरी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी ठरलेला नाही.
-हिंदू मतपेढीवर भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा चांगला प्रभाव आहे. हे दोघेही एकत्र आल्यास काँग्रेससमोर शहरी भागांमध्ये मोठी समस्या उभी राहणार आहे. कॅप्टन अमरिंदर यांनी यापूर्वीच भाजपसोबत आघाडी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
-आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यामुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा शीख राहणार असल्याचे सांगणारे केजरीवाल प्रचार मात्र स्वतः करत आहेत. शहरी क्षेत्र आणि विशेषकरून व्यापारीवर्गाकडून त्यांना चांगला पाठिंबा मिळतोय.
सिद्धू यांच्याकडून प्रयत्न
काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी चंदीगड येथील संयुक्त हिंदू महासभेच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. माझी आई हिंदू आणि वडिल शीख होते. मी हिंदू का शीख हे ठरवा, माझ्या रक्ताच्या थेंबात हे पाहिले जावे. नवज्योत सिद्धू हा पंजाबच्या सौहार्दाचे प्रतीक असल्याचे उद्गार त्यांनी काढले होते. सिद्धू यांनी यापूर्वीही विविध पूजांमध्ये भाग घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्यासोबत त्यांनी अलिकडेच केदारनाथचा दौरा केला आहे.