शेतकऱयांच्या पाठीशी राहण्याचा निर्वाळा
चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबमध्ये काँग्रेसचे ज्ये÷ नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चन्नी हे पंजाबचे मुख्यमंत्री होणारे दलित समाजातील पहिले व्यक्ती ठरले. चन्नी यांच्यासोबतच सुखजिंदर सिंग रंधावा आणि ओमप्रकाश सोनी यांनीही शपथ घेतली. त्यांना उपमुख्यमंत्रिपदी विराजमान केले जाणार असल्याचे समजते. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी यांना शुभेच्छा दिल्या. राहुल गांधी शपथविधी सोहळय़ासाठी उशिरा पोहोचले.
पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत भावूक झाले. शपथविधीनंतर पंजाब भवनात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कृषी सुधारणा कायद्यासंबंधीही भाष्य केले. आपले सरकार शेतकऱयांच्या पाठीशी राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच ही मोठी जबाबदारी दिल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानले. काँग्रेसने सामान्य माणसाला मुख्यमंत्री बनवल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, याप्रसंगी नवज्योत सिद्धू यांचे वर्चस्व दिसून आले. पत्रकार परिषदेवेळी चन्नी यांच्या बाजूलाच सिद्धू विराजमान झाले होते.
पाणी आणि वीज बिल माफ करू
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर चन्नी यांनी शेतकरी आणि सामान्य लोकांना मोठी भेट दिली आहे. पंजाब सरकार शेतकऱयांच्या पाठीशी उभे आहे. आम्ही शेतकऱयांचे पाणी आणि वीज बिल माफ करू. आम्ही केंद्राला तीन कृषी कायदे मागे घेण्याचे आवाहन करतो. जर हे तीन कायदे मागे घेतले नाहीत तर शेती संपेल आणि पंजाबमधील प्रत्येक कुटुंबियांवर याचा परिणाम होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, वाळू माफियांवर कारवाई केली जाईल आणि सर्व प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असेही चरणजीत सिंग चन्नी म्हणाले. काँग्रेस नेतृत्वाने ठरवलेल्या 18 कलमी कार्यक्रमाचा उल्लेख करताना त्यांनी सरकार काँग्रेसच्या विचारधारेवर चालणार आहे, जे सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे, असेही ते म्हणाले. जात किंवा पंथाच्या नावाने कोणीही फोडू शकत नाही. पंजाबची एकता, अखंडता आणि बंधुता राखली पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र राहायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.