प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा परिषदेने यापूर्वी स्वच्छ भारत अभियानात दिल्ली दरबारी पुरस्कार घेतला आहे. तसेच वैयक्तिक पातळीवर ग्रामपंचायतींनीही राज्य स्तरावर पुरस्कार पटकावले आहेत. नुकताच रविवारी दुपारी केंद्र शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले की पाटण तालुक्यातील ढोरोशी गावास पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे. पुरस्कार जाहीर होताच ढोरोशी गावच्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी कोरोना काळात पदभार स्वीकारला. कोरोना असल्याने शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यांना अडचण येत होती. परंतु त्यांनी जिह्यात प्रभावीपणे आपल्या कामातून चुणूक दाखवली त्यामुळे दिल्ली दरबारी जिल्हा परिषदेचा सन्मान झाला. केंद्र शासनाच्यावतीने रविवारी दुपारी पंडित दिनदयाळ उपाध्याय पुरस्कारासाठी ढोरोशी या गावाचा समावेश असल्याचे जाहीर करण्यात आले. हा पुरस्कार प्रदान दि. 24 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे ढोरोशी गावात आनंदीआनंद आहे.
सर्वांच्या मदतीमुळे गावचा सन्मान होतोय
ढोरोशी ग्रामपंचायतीस हा पुरस्कार मिळवण्यासाठी पाटणच्या गटविकास अधिकारी श्रीमती मिना साळुंखे, विस्तार अधिकारी वाघ, कुंभार, ग्रामस्थ, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, जि. प. प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा स्ययंसेविका, अरोग्य विभागाचे सर्व कर्मचाऱयांचे योगदान लाभले आहे.
नलिनी महेंद्र मगर
ढोरोशीचे सरपंच