पंढरपूर / प्रतिनिधी
आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपुरात आजपासून 25 जुलैपर्यंत संचारबंदीचा अंमल असणार आहे. त्यादृष्टीने शहराकडे येणारी सर्व वाहतूक वळवण्यात आली आहे. तर पंढरपुराभोवती पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त देखील लागू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रतीकात्मक होणाऱया आषाढीची लगबग सर्वार्थाने पंढरीत सुरू असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे सलग दुसऱयावर्षी आषाढी एकादशीचा सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा होत आहे. यंदा केवळ 400 वारकरी भक्तांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने कोरोनाचा प्रसार पंढरपुरात होऊ नये आणि 400 वारकरी भक्तांसह पंढरीत येणाऱया संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी पंढरपूर शहरासह आसपासच्या दहा गावांमध्ये आजपासून संचारबंदी लागू होत आहे. त्यादृष्टीने सध्या चंद्रभागेकडे, मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
शहरातील नगर प्रदक्षिणा मार्गाच्या आतील संपूर्ण परिसर, मंदिर परिसर, चंद्रभागेचे सर्व घाट आणि वाळवंटामध्ये 25 जुलैपर्यत संचारबंदी असेल. तर उर्वरित शहरात आणि गोपाळपूर येथे 24 जुलैपर्यत जमावबंदी असणार आहे. याशिवाय पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी गावांमध्ये केवळ 22 जुलै रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. या अनुषंगाने एसटी बससह खासगी वाहतूकही पंढरपूरकडे येणारी बंद होत आहे.
सध्या संचारबंदी आणि पंढरपूरच्या वारीच्या बंदोबस्ताकरिंता 300 अधिकाऱयांसह 2500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच संचारबंदीपूर्वी पंढरपुरातील विविध 450 मठांची तपासणी करून वास्तव्यासाठी असणाऱया वारकरी भक्तांना आरोग्याच्या दृष्टेकोनातून परतीचा मार्ग पोलिसांकडून दाखवला जात आहे. त्यामुळे साहजिकच आजपासून सुरू होणारी संचारबंदी सर्वार्थाने कडक अंमलाखाली पंढरपुरात होण्याची शक्यता आहे.