प्रतिनिधी /पणजी
आजच्या प्रचंड महागाईच्या जमान्यात जेथे शहरी भागात कपभर चहासाठी सुद्धा 100 रुपये मोजावे लागतात तेथे एका ग्रामीण भागात दरमहा केवळ 100 रुपये पगारावर गुजराण करणाऱया एका गरीब असहाय्य महिलेच्या दैवदुर्विलासाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने घेतली असून तिला त्वरित न्याय द्यावा, असा आदेश आरोग्य खात्याला देण्यात आला आहे.
विश्वास बसणार नाही असा हा धक्कादायक प्रकार नेत्रावळी सांगे या भागातील ग्रामीण आरोग्य केंद्रावर उघडकीस आला होता. 1990 पासून म्हणजे गेल्या सुमारे 31 वर्षांपासून त्या केंद्रात झाडू मारणे आणि पाणी भरण्याचे काम करणाऱया लक्ष्मी मोरजकर या अनुसूचित जातीतील वयोवृद्ध महिलेस केवळ 100 रुपये वेतन देण्यात येत होते. सदर असहाय्य महिला ते 100 रुपये वेतन मुकाटय़ाने घेत होती, परंतु तिला ते पैसे देणाऱयास सुद्धा तिची दया कशी येत नव्हती? त्याची माणुसकी कशी जागी होत नव्हती? असे प्रश्न उपस्थित झाले होते. खरेतर त्यानेच तिची समस्या आणि परिस्थितीची जाणीव आपल्या वरिष्ठांना करून देत तिचा पगार वाढवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते.
राज्यात नाही म्हणण्यास ’किमान वेतन कायदा’ अस्तित्वात आहे, परंतु सदर महिलेच्या नशिबी तेही सुख नव्हते. पगारवाढ करण्याची मागणी केल्यास नोकरी गमावण्याची भीती होती, म्हणून तिने कधीच आवाज काढला नाही व वयाच्या साठीपर्यंत ती तेवढय़ाच तुटपूंज्या पगारावर काम करत राहिली. पदरी तीन पूत्र असलेल्या या महिलेस वयोवृद्धतेमुळे मध्यंतरी एक दोनदा कामावर येऊ नकोस असेही सांगण्यात आले होते.
‘तरुण भारत’ने वेधले होते लक्ष
एक दिवस हा प्रकार तरुण भारतच्या पत्रकाराच्या लक्षात आला आणि दै. तरुण भारतमधून तिची व्यथा मांडण्यात आली. सदर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांनी तिच्याबद्दल हळहळ व्यक्त केली. त्यापैकीच एक असलेले फातोर्डा येथील नवनाथ नेरुरकर या सामाजिक कार्यकर्त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिले. त्यात दै. तरुण भारतमधील बातमीचे कात्रण जोडून तिची व्यथा मांडली व तिला न्याय देण्याची कळकळीची विनंतीही केली.
पंतप्रधान कार्यालयानेही त्यांच्या पत्राची त्वरित दखल घेतली व गोव्याच्या आरोग्य खात्याला एसएमएस पाठवून सदर महिलेच्या प्रकरणात लक्ष घालून तिला न्याय मिळवून देण्याचा आदेश दिला. या प्रकारातून निदान आतातरी सरकारी अधिकाऱयांचे डोळे उघडतील व आरोग्य खाते जागृत होईल, त्यातून सदर महिलेस न्याय मिळेल, असा विश्वास नेरुरकर यांनी व्यक्त केला आहे.