दिल्ली / प्रतिनिधी
देशामध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकींची मतमोजणी सुरु आहे. देशात शनिवारी ३,९२,४८८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २४ तासात साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाने दिली आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या १ कोटी ९५ लाख ५७ हजार ४५७ इतकी झाली आहे. दरम्यान देशातील करोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक महत्वाची आढावा बैठक बोलावली आहे.
देशात कोरोनाची संख्या वाढत असताना या संकटाचा सामना करण्यासाठी किती सज्जता आहे खास करुन मानुष्यबळ किती आहे याची चाचपणी या बैठकीत केली जाणार आहे. याबैठकीनंतर मोदी कोणता निर्णय घेतील याकडे साऱ्यांच्या नजरा असणार आहे. कोविड टास्क फोर्सने तर देशात लॉकडाऊनला पाठिंबा दिला आहे. कोरोना टास्क फोर्सपासून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाऊन आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये काही मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. रविवारी (२ मे २०२१ रोजी) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही बैठक सुरु झाली आहे.
टास्क फोर्सचे लॉकडाऊनला समर्थन
केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधल्या काही सदस्यांनी देशभरात कडक लॉकडाऊन लावण्याची भूमिका मांडली असल्याची माहिती मिळत आहे. वेगाने होणारा प्रसार फक्त लॉकडाऊननेच नियंत्रणात आणता जाऊ शकतो असे सदस्यांचे मत आहे. जेव्हा कोरोनाचा समूह प्रसार होतो, तेव्हा चाचण्या करणं कठीण होऊन जातं. त्यामुळे सगळेच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं गृहीत धरून त्यांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखू शकता. आणि हे फक्त लॉकडाऊन लावल्यामुळेच शक्य होईल, असं टास्क फोर्सने म्हटलं आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिल्यास देशातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल अशी भीतीही टास्क फोर्सने व्यक्त केलीय.
अमेरिकन तज्ज्ञांचाही लॉकडाउनचा सल्ला
भारतात वाढणारी कोरोनाची संख्या लक्षत घेऊन अमेरिकन प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी एस. फौसी यांनी देखील याच धर्तीवर भारताला सल्ला दिला आहे. “भारतात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेड्स मिळत नाहीत. औषधांचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे रुग्णांसोबत सामन्य जनता अडचणीत आली आहे. कोरोनाच्या विस्फोटामुळे भारतात यावेळी कठीण परिस्थिती आहे. त्यामुळे आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची गरज आहे. तरच रुग्णसंख्या कमी होईल.”, असं मत डॉ. फौसी यांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता साऱ्या देशाचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे लागलं आहे.