मुंबई \ ऑनलाईन टीम
पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही, असा टोला सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
संदीप देशपांडे यांनी बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरे देखील महाराष्ट्रात फिरतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता.
संदीप देशपांडे यांनी यापूर्वी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वाट करत म्हटले होते , आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे त्याच श्रेय मुंबई मॉडेल,मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत .म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात???, असा सवाल त्यांच्याकडून करण्यात आला होता.