21 व्या शतकातील शालेय शिक्षण संमेलनात ऑनलाईन सहभाग : नव्या शैक्षणिक धोरणाचे केले जोरदार समर्थन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘21 व्या शतकातील शालेय शिक्षण’ या विषयावर आयोजित संमेलनामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी आणि पालकांसाठी ‘फाईव्ह सी’चा सल्ला दिला आहे. या कार्यक्रमास शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हेही उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताची भविष्याची गरज लक्षात घेऊन आखण्यात आले आहे. नवीन विचार आणि देशाची कुशल मनुष्यबळाची मागणी याचा विचार करण्यात आला आहे. शैक्षणिक आणि बाजारपेठेतील तज्ञांशी चर्चा करुन गेल्या चार ते पाच वर्षांपासून या शैक्षणिक धोरणाची आखणी केली जात होती. प्रत्येक क्षेत्रातील, भाषातील अभ्यासक, तज्ञ यासाठी कार्यरत होते. अद्यापही याच्यावर काम करणे सुरुच आहे, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना आणि पालकांना सल्ला देताना ते म्हणाले, एक परीक्षा अथवा एक प्रगतीपुस्तक मुलांची मानसिकता स्पष्ट करु शकत नाही. मात्र आज हे मार्कशीटच मुलांसाठी प्रेशरशीट बनू लागले आहे. याची पालकांनी गंभीरपणे दखल घेण्याची गरज आहे. मुलांपेक्षाही त्याच्या मार्कशीटमध्ये पालकांना अधिक रस दिसतो. केवळ गुण म्हणजे मुलांची बुद्धी समजली जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुलांना अभ्यासाबरोबरच क्रीडांगणावर खेळण्यासाठी पाठवले पाहिजे, यातून त्यांना अनेक गोष्टी शिकता येतात. नेतृत्वगुण, समूह कौशल्य यातूनच विकसीत होते, असेही ते म्हणाले.
तथापि पालकांची भिस्त मात्र अभ्यासावरच अधिक असते. ते बाहेर जाऊन मुलं शिकतात काय याचीही कधीही चाचपणी करत नाहीत, अथवा बाहय़ जगाशी त्याचा डोळे आणि कान उघडे ठेवून संपर्क वाढवू देत नाही. कोणालाही पहिली विचारणा ‘तुला मार्क किती’ अशीच होते. मात्र कोणीही त्याच्या आकलनाबाबत चाचपणी करत नाही, हे दुर्दैवी आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाची आखणी करताना सुमारे 15 लाख सल्ले प्राप्त झाले आहेत. यामध्ये शिक्षकांची संख्या अधिक आहे. देशातील प्रत्येक क्षेत्र वैशिष्टय़पूर्ण आहे. प्रत्येक प्रांताचे, जिल्हय़ाचेही वेगळे वैशिष्टय़ आहे. तेथील कला, उत्पादने जगभर प्रसिद्ध आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी झाल्या पाहिजेत, ही भव्यदिव्य परंपरा त्यांना समजली तर औत्सुक्य निर्माण होऊन त्यांचे विचार नवनिर्मितीसाठी झेप घेऊ शकतील, असेही ते म्हणाले.
नवीन शतकातील कौशल्य प्राप्त करण्यासाठी मुलांमध्ये क्रिएटीव्ह थिंकिंग, क्रिएटिव्हीटी, कोलॅब्रेशन, क्युरिऑसिटी आणि कम्युनिकेशन हे पाच सी अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. भाषा हेच मुलांसाठी शिक्षणाचे प्रभावी साधन आणि माध्यम असते. ते पालकांनी समजून घेतले पाहिजे. मुलांना सहज समजत असेल आणि कळत असेल तीच अभ्यासाची भाषा हवी, या नियोजनातूनच नवीन शैक्षणिक धोरणाची आखणी केल्याचेही ते म्हणाले.