पॅरालिम्पिकमध्ये दडपण न घेता खेळण्याचे खेळाडूंना आवाहन, 24 ऑगस्टपासून स्पर्धेस प्रारंभ
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया पॅरा खेळाडूंशी सुसंवाद साधला आणि ‘तुम्ही विजेते आणि रोल मॉडेलच आहात,’ अशा शब्दांत त्यांना प्रोत्साहित केले.
दहा क्रीडापटूंशी त्यांनी व्हर्च्युअली संवाद साधला. त्यात 2016 रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱया देवेंद्र झाझरिया, मरियप्पन थांगवेलू यांचा समावेश होता. आगामी स्पर्धेत कोणतेही दडपण न घेता बिनधास्त खेळ करा, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी त्यांना दिला. त्यांच्या कुटुंबियांशी तसेच त्यांच्या प्रशिक्षकांशीही त्यांनी चर्चा केली. पॅरालिम्पिकचे आयोजन 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. ‘तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींना तुम्हाला तोंड द्यावे लागले आहे, तरीही नाउमेद न होता तुम्ही संघर्ष करीत आहात. कठोर परिश्रम आणि जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर सर्व अडचणींवर मात करून तुम्ही इथवर पोहोचला असून ऑलिम्पिक या क्रीडा जगतातील सर्वात मोठय़ा महोत्सवात देशाचे प्रतिनिधित्व करीत आहात. तुम्ही सर्व विजेतेच आहात आणि इतरांसमोरील आदर्शही आहात. तेव्हा पदक जिंकण्याचा कोणताही दबाव न घेता खेळा. तुम्ही तुमच्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करा, पदके तुम्हाला मिळत जातील. तुम्ही देशाचा गौरव वाढविणार आहात,’ अशा शब्दांत मोदी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
भारत या स्पर्धेसाठी 54 सदस्यांचे आजवरचे सर्वात मोठे पथक पाठवत असून यावेळी आपले खेळाडू सर्वोत्तम यश मिळवतील, अशी अपेक्षा केली जात आहे. या पथकातील झाझरिया (एफ-46 भालाफेक), मरियप्पन (टी-63 उंच उडी), वर्ल्ड चॅम्पियन संदीप चौधरी (एफ-64 भालाफेक) हे पदकाचे दावेदार आहेत. झाझरियाने यापूर्वी 2004 व 2016 मध्ये सुवर्णपदक पटकावले असून तिसऱयांदा त्याची पुनरावृत्ती करण्यास तो उत्सुक झाला आहे. भारत एकूण 9 क्रीडाप्रकारात सहभागी होणार आहे.
रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा थांगवेलू मरियप्पन उद्घाटन सोहळय़ावेळी भारताचा ध्वजधारक असेल. पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या सुसंवादात ज्योती बालन, राकेश कुमार (पॅरा तिरंदाज), सोमन राणा (पॅराऍथलेट), पलक कोहली, पारुल परमार (पॅराबॅडमिंटन), प्राची यादव (पॅराकॅनोईंग), सकिना खातुन (पॅरापॉवरलिफ्टिंग), सिंघराज (पॅरानेमबाजी) यांचाही सहभाग होता. या स्पर्धेत ते नवा इतिहास निर्माण करतील, अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनीही पॅराखेळाडूंना शुभेच्छा दिल्या. ‘गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या पॅराऍथलेट्सनी प्रभावी प्रदर्शन केले आहे. पॅरालिम्पिकमध्ये आम्ही आजवर 12 पदके मिळविली आहेत. यावेळीही ते सर्वोत्तम यश मिळवित भारताचा गौरव वाढवतील,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची मोहिम पुरुष व महिलांच्या तिरंदाजीने 27 ऑगस्टपासून सुरू होईल.