नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या दुसऱया टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महनीय ‘ज्येष्ठां’नी लस टोचून घेतली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचाही या लसींवरील विश्वास अधिकच वाढला असून लसीकरण उपक्रमाला वेग येण्याची अपेक्षा ओ. 1 मार्चपासून कोरोना लसीकरण मोहिमेचा दुसरा देशव्यापी टप्पा सुरू झाला असून याअंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना लस दिली जात आहे. 1 मार्चला पहिल्याच दिवशी दुपारी एक पर्यंत 10 लाखांहून अधिक नागरीकांना लसीकरणासाठी को-विन पोर्टलवर नोंदणी केली. सरकारी रुग्णालयांसह निवडक खासगी रुग्णालयांमध्येही लस मिळण्यास सुरुवात झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये लस 250 रूपयांमध्ये उपलब्ध केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एम्स रुग्णालयात कोविड लस टोचून घेतली. त्यानंतर सर्व लाभार्थ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘भारत बायोटेक’निर्मित कोव्हॅक्सिनचा पहिला डोस आज मी घेतला आहे. कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आमच्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी चांगले कार्य केले आहे. हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे, अशी माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे.
मोदींच्या लसीकरणाने साधले ‘राजकारण’
मोदींनी लसीकरणावेळी स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने आसाममधील पंचा गळय़ात घातला होता. तर लसीकरणावेळी उपस्थित असलेल्या दोन नर्स या पुदुच्चेरी आणि केरळच्या होत्या. मोदींना लसीचा डोस देण्याऱया नर्सपैकी एका नर्सचे नाव पी. निवेदा असून त्या पुदुच्चेरीच्या आहेत. विशेष म्हणजे नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या असून त्यामध्ये या तीन राज्यांचा समावेश आहे. आसाम, पुदुच्चेरी आणि केरळ या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे कोरोना आणि निवडणुका असे दोन लक्ष्य मोदींनी डोळय़ासमोर ठेवल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, लस घेताना मास्कचा वापर न केल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावरून टीकाही झाली आहे.