- केंद्राने चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा
ऑनलाईन टीम / मुंबई :
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात आहे, असे वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला.
रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी गंभीर दखल घेतली पाहिजे आपण चीन आणि पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, शेतकरी आंदोलनापाठी चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा गंभीर मुद्दा रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या दानवे यांनी हे वक्तव्य केले म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी सबळ पुरावे असणारच. त्यांनी ते पुरावे द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच केंद्र सरकारने कृषी कायद्यांची अंमलबजावणी प्रथम भाजपशासित राज्यांमध्ये करावी. त्यानंतर या कायद्यांचा काय परिणाम होतो हे पाहून पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारला तोडगा काढणे शक्य होते. मात्र, केंद्र सरकारला हा विषय अधांतरी ठेवण्यातच रस आहे. बिहारमध्ये कृषी कायद्यासारख्या सुधारणा झाल्या होत्या. माझ्या माहितीप्रमाणे सध्या बिहारमध्ये धान्याचा भाव 900 रुपये इतका आहे, तर पंजाबमध्ये हाच भाव 1500 रुपये इतका आहे. मग आता बिहारमधील शेतकऱ्यांनी धान्य विकण्यासाठी पंजाबमध्ये जावे का, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.