आरटीआय अंतर्गत माहिती सादर- 2020-21 मधील आकडेवारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ष 2020-21 मध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत (पीएमजेजेबीवाय) जवळपास 4,698.10 कोटी रुपयाचे पेमेन्ट करण्यात आले असल्याची माहिती आहे. सदरच्या योजनेमध्ये 2,34,905 इतक्या मृत्यूचे दावे निकालात काढले आहेत, अशी माहिती अधिकाराच्या (आरटीआय) अंतर्गत मिळालेल्या माहितीमधून उपलब्ध झाली असून मागील 5 वर्षांत ही सर्वाधिक रक्कम राहिली आहे.
पीएमजेजेबीवायसह केंद्राच्या आर्थिक सेवा विभागाकडून ही माहिती प्राप्त झाली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौडा यांनी दिली आहे. परंतु या दाव्यामध्ये व्यक्ती कोणत्या कारणांमुळे मृत झाल्या आहेत, याची कोणतीही माहिती दिली नसल्याचे नमूद केले आहे.
सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार 2020-21 मध्ये पीएमजेजेबीवायच्या अंतर्गत एकूण 2,50,351 मृत्यूचे दावे प्राप्त झाले होते त्यामधील 13,100 दावे रद्द केले आहेत. अन्य 2,346 दाव्याचे पेमेन्ट केल्याची माहिती आहे.
विमाधारकांना मृत्यू दाव्याची सोय
पीएमजेजेबीवायमध्ये इन्शुरन्स प्लॅन उपलब्ध करुन दिला जात असून यामध्ये गुंतवणुकीनंतर विमाधारकांबाबत कोणतीही दुर्घटना झाल्यास त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर संबंधीताच्या कुटुंबाला 2 लाख रुपये दिले जात असल्याचे सांगितले आहे. ही योजना मे 2015 पासून सुरु करण्यात आल्याची माहिती आहे.