ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारने लॉक डाऊनची घोषणा केली होती. लॉक डाऊनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपत आहे. तरी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता व्हिडिओच्या माध्यमातून देशवासीयांची संवाद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत त्यांनी लॉक डाऊन वाढवण्याचे संकेतही दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मोदी आज काय घोषणा करणार याबाबतही उत्सुकता आहे.
दरम्यान, लॉक डाऊन सुरू झाल्यापासून मोदींनी देशाला दोन वेळा संबोधित केले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला एक दिवसाचा जनता कर्फ्यू आणि त्यानंतर कोरोनाशी लढणारे डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी थाळी वाजवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर घरातील लाईट बंद करून दिवा लावण्यास सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लॉक डाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यांपेक्षा चौथा टप्पा वेगळा असेल, अशी चर्चा आहे. यामध्ये राज्यांना अधिकचे अधिकार मिळू शकतात. लॉक डाऊन चा चौथा टप्पा सुरू झाल्यास आर्थिक व्यवहारांना सवलत मिळण्याची शक्यता आहे.
तसेच काल झालेल्या बैठकीमध्ये मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लॉक डाऊन कसा हाताळणार याची व्यापक रणनीती तयार करून त्याची 15 मे पर्यंत माहिती द्या अशी सूचना देखील दिली आहे.