ऑनलाईन टीम/दिल्ली
कोरोना परिस्थिती आणि मोदी सरकारच्या ढिसाळ कार्यपध्दतीवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी वेळोवेळी मोदी सरकारवर निशाना साधत आहेत. यातच देशात म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावावरुन राहुल गांधींनी मोदी सरकावर हल्लाबोल चढवला आहे. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या प्रादुर्भावाला मोदी सरकारचं कुशासन जबाबदार असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. आता या आजाराशी लढण्यासाठी ते टाळ्या थाळ्या वाजवण्याची घोषणा करतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, मोदी सिस्टीमच्या कुशासनामुळे फक्त भारतामध्येच कोरोनासोबतच ब्लॅक फंगसची नवी महामारी आली आहे. लसींचा तुटवडा तर आहेच, पण या नव्या आजारावरच्या औषधांचाही तुटवडा आता निर्माण झाला आहे. याविरोधात लढण्यासाठी आता पंतप्रधान टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची घोषणा करतच असतील.
कोरोना महामारीनंतर देशात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. यावरून विरोधक सतत मोदी सरकारवर टीका करत आहे. देशातील लसीकरण सुद्धा ठप्प झाले आहे. यावरुनही विरोधकांनी मोदींनी विदेशात लशी पाठवल्यामुळे लशीची कमतरता जाणवत असल्याचे टिकास्त्र सोडले. तर कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी याआधीही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून सूचना केल्या आहेत.