सिलिगुडीत ममता बॅनर्जींचा भाजपवर पलटवार, ‘खेलो होबे’चा नारा
कोलकाता / वृत्तसंस्था
एकीकडे कोलकात्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महासभा होत असताना ममता बॅनर्जी यांनी उत्तर बंगालमधील सिलिगुडी येथे मिरवणुकीद्वारे शक्तीप्रदर्शन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी जनतेला खोटी आश्वासने दिली, असा आरोप त्यांनी केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँगेसचाच पुन्हा विजय होईल. सर्व विरोधकांचा पाडाव होईल. आम्ही हा निवडणुकांचा खेळ खेळू, जिंकू आणि पाहू असे आवाहनही त्यांनी भाजप तसेच अन्य विरोधी पक्षांना दिले.
पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. परिवर्तन पश्चिम बंगालमध्ये नव्हे, तर केंद्रात होणार आहे. आपल्या सरकारने अनेक लोकोपयोगी कामे करून लोकांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. पश्चिम बंगाल हे शांतताप्रिय राज्य आहे. भाजप येथे समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असून तो यशस्वी होणार नाही. राज्याचा विकास करण्याची क्षमता तृणमूल काँगेसमध्येच आहे, असेही दावे त्यांनी केले.
गॅस स्वस्त करा
स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. ते केंद्र सरकारने कमी करावेत. वाढत्या दरांमुळे गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे. केंद्र सरकारने जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे त्वरित वाढलेले गॅस दर मागे घ्यावेत, अशी मागणी बॅनर्जी यांनी त्यांच्या मिवणुकीनंतरच्या भाषणात केली.
दंगेखोर भाजपला आवरा
भाजप हा दंगे घडविणारा पक्ष आहे. त्याला समाजात फूट पाडून सत्ता बळकावायची आहे. पण राज्यातील जनता त्याला तसे करू देणार नाही. लोकांनी भाजपच्या दंगेखोर वृत्तीला आवरण्यासाठी आता एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राज्यातील जनता पिढय़ानपिढय़ा जात, धर्म हे भेद विसरून गुण्यागोविंदाने रहात आहे. लोकांनीच आता रस्त्यावर येऊन भाजपला आवरावे, असे आवाहन केले.
तर राज्याचे विभाजन होईल…
राज्यातील लोकांनी भाजपला सत्ता दिली तर हा पक्ष राज्याचे विभाजन करेल. तशी योजना त्याने तयार केली आहे. लोकांनी भाजपला रोखले नाही तर राज्याची एकात्मता नष्ट होऊन दुफळी माजणार आहे. राज्याचे विभाजन झाल्यास लोकांचे अपरिमित आर्थिक आणि सामाजिक नुकसान होईल, असा दावा त्यांनी केला.