सकाळी 10 वाजता संदेश : लॉकडाऊनसंबंधी महत्वपूर्ण घोषणा शक्य, अर्थव्यवस्थेसंबंधी निर्णय
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन आठवडय़ांपूर्वी घोषित केलेल्या राष्ट्रव्यापी लॉकडाऊनचा कालावधी आज मंगळवारी पूर्ण होत आहे. तो यापुढेही राहणार की नाही, यासंदर्भातील महत्वपूर्ण घोषणा ते सकाळी 10 वाजता, राष्टाला उद्देशून केलेल्या भाषणात करणार आहेत. याशिवाय उद्योग, सेवाक्षेत्र आणि कृषी यासंबंधीच्या धोरणासंबंधीही त्यांच्याकडून भाष्य केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडे साऱया देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या शनिवारी मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन तास सविस्तर चर्चा केली होती. त्यावेळी बव्हंशी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी केली होती. विशेषतः पंजाब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यासंबंधी अधिक आग्रही होते. या दोन राज्यांनी नंतर लॉकडाऊन वाढविण्याची परस्पर घोषणाही करून टाकली होती. केंद्र सरकारने मात्र लॉकडाऊनप्रमाणेच अर्थव्यवस्थेचाही विचार करून घोषणा करण्याचे ठरविले आहे.
अर्थव्यवस्थेचा विचारही आवश्यक
व्यापार, उद्योग, उत्पादन, सेवाक्षेत्र आणि कृषीक्षेत्र गेले तीन आठवडे बंद आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर व केंद्राच्या तसेच राज्यांच्या उत्पन्नावर होत आहे. कोरोनाशी लढायचे असेल तर त्यासाठी मोठय़ा प्रमाणात धन लागणार आहे. अर्थव्यवस्था अधिक काळ बंद राहिल्यास धनप्राप्ती न झाल्याने कोरोनाविरूद्धच्या या युद्धात मोठा फटका बसू शकतो. याचा विचारही आता केंद्र सरकारला करावा लागणार आहे. त्यामुळे 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढविण्यात आला तरी त्याचे स्वरूप वेगळे असेल असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
मर्यादित मोकळीक देणार ?
खरीप मोसमाची कृषीची कामे सुरू केली जाण्याची शक्यता आहे. तसेच औद्योगिक उत्पादन काही प्रमाणात सुरू केले जाण्याचीही शक्यता आहे. रोजगार निर्मितीक्षम व्यवसायांवरील निर्बंध काही प्रमाणात उठविण्याची घोषणा पंतप्रधान मेदी करतील अशी अपेक्षा आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून जे उद्योग आणि व्यवसाय करता येतील ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. उत्पादन उद्योगांना एक तृतीयांश कामगारांसह काम सुरू करण्याची मुभा मिळणे शक्य आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र नेमके स्वरूप भाषणानंतरच स्पष्ट होईल.
दुरूस्ती कामांना मुभा
दुरूस्ती कामे करणाऱयांना लॉकडाऊनमधून मोकळीक मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंटरनेट, मोबाईल, घरगुती दुरूस्त्या आणि इतर छोटी कामे करणाऱया असंघटित व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे. तसेच रोजगार मिळविणाऱयांचा आणि हातावरचे पोट असणाऱयांचा उत्पन्नाचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांचे स्थलांतर थांबण्याची शक्यता आहे.
विभागीय निर्बंधांची घोषणा शक्य
प्रत्येक राज्यातील जिल्हय़ांची तांबडा, केशरी आणि हरित अशी विभागणी करावी अशी सूचना पंतप्रधान मोदींकडून होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा धोका सर्वात जास्त आहे असे जिल्हे तांबडे म्हणून ओळखले जातील. जेथे धोका कमी आहे ते केशरी आणि जेथे कोरोनाची लागण झालेली नाही किंवा नगण्य आहे असे जिल्हे हरित म्हणून ओळखले जातील. हरित जिल्हय़ांमध्ये आर्थिक व्यवहारांना मोठय़ा प्रमाणात मोकळीक मिळण्याची शक्यता आहे.
आंतरराज्य वाहतुकीस अनुमती
जीवनावश्यक वस्तूंच्या आंतरराज्य वाहतुकीस मंगळवारपासून अनुमती देण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही घोषणा सोमवारी केली. यामुळे दूध, अन्नधान्ये आणि भाजीपाला देशभर उपलब्ध होण्यास साहाय्य होईल. मात्र कोणताही व्यवहार करताना एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखूनच तो करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून तशी अनिवार्यता लागू होण्याची शक्यता आहे.
प्रवासी वाहतुकीचे प्रश्नचिन्ह
रेल्वे, बस, विमाने आणि इतर प्रकारच्या प्रवासी वाहतुकीसंबंधी कोणती घोषणा पंतप्रधान मोदी करतात याकडे उत्सुकतेंने पाहिले जात आहे. मालवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच मालगाडय़ा आणि मालवाहू विमानांना अनुमती दिली जाऊ शकते. काही प्रमाणात प्रवासी विमानेही सुरू केली जाऊ शकतात. पण बस, कार किंवा अन्य प्रकारे जिल्हय़ाबाहेर प्रवास करण्यावरची बंधने काढून घेतली जाणार नाहीत, अशी शक्यता आहे.
जनता तसेच उद्योजकांना उत्सुकता…
ड लॉकडाऊन किती काळासाठी वाढणार आणि त्याचे स्वरूप काय असणार
ड उद्योगधंद, व्यापार सुरू करण्यास किती प्रमाणात व कशी अनुमती मिळणार
ड हातावरचे पोट असणाऱया असंघटित कामगार, उद्योजकाविषयी काय निर्णय
ड प्रवासी आणि मालवाहतुकीसंबंधी 14 एप्रिलनंतरचे धोरण काय असणार ड कृषी, उद्योगांची कामे सुरू करण्याची अनुमती मिळाल्यास नियम कोणते