अनेक मतदारसंघात उमेदवार अन् योगी सरकारबद्दल नाराजी
राम मंदिर आंदोलनावेळी भाजपचा गड ठरलेल्या काशीच्या 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये 2017 च्या निवडणुकीत भाजपने सहकारी पक्षांसोबत क्लीन स्वीप केले होते. मोदी लाटते मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदींची जादू चालली होती. येथील शहर दक्षिण मतदारसंघात 1989 पासून तर कँट मतदारसंघात 1991 पासून भाजपचा कब्जा आहे. तर शहर उत्तर मतदारसंघात 2012 पासून भाजपचा आमदार आहे. काशीच्या 8 पैकी 3 मतदारसंघांमध्ये यंदा भाजपला तीव्र आव्हान मिळत असल्याचे राजकीय जाणकारांचे मानणे आहे. वाराणसी दक्षिण मतदारसंघात भाजपचा मुकाबला समाजवादी पक्षाशी आहे. तर पिंडरा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. तर सेवापुरीमध्ये सप आणि भाजप यांच्यातच मुख्य लढत होत आहे.
वाराणसी दक्षिण
शहर दक्षिण मतदारसंघ हे वाराणसीचे हृदय असल्याचे तेथे म्हटले जाते. येथे उत्तरवाहिनी गंगा बाबा विश्वनाथांच्या चरणाला स्पर्श करते. हा मतदारसंघ 1998 पासून भाजपकडे आहे. येथे मुख्य राजकीय लढत भाजपचे डॉ. नीलकंठ तिवारी आणि सपचे कामेश्वर दीक्षित यांच्यात होत आहे. येथे एकूण 3 लाख 23 हजार 470 मतदार आहेत. यापैकी ब्राह्मण, मुस्लीम, कायस्थ, बंगाली, वैश्य, यादव आणि खत्री मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. उर्वरित मतदारांमध्ये ओबीसी, अनुसूचित जाती, गुजराती आणि मराठी समुदायाचा समावेश आहे.
पिंडरा मतदारसंघ
वाराणसीचा पिंडरा मतदारसंघ जौनपूर जिल्हय़ाला लागून आहे. येथे 5 उमेदवार उभे असून मुख्य लढत 5 वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे उमेदवार अजय राय आणि भाजपचे विद्यमान आमदार डॉ. अवधेश सिंह यांच्यात आहे. 3,72,639 मतदार असलेल्या मतदारसंघात कुर्मी, ब्राह्मण, दलित आणि यादव मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. याचबरोबर क्षत्रिय, भूमिहार, वैश्य, राजभर, मौर्य, चौहान यांच्यासह अन्य जातींबरोबर मुस्लीम मतदार देखील आहेत.
सेवापुरी मतदारसंघ
2012 मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघाचे पहिले आमदार सपचे सुरेंद्र सिंह पटेल होते. 2017 च्या निवडणुकीत अपना दल (एस)चे उमेदवार नीलरतन सिंह पटेल यांनी सुरेंद्र पटेल यांना पराभूत केले होते. यंदा 10 उमेदवार उभे असले तरीही मुख्य राजकीय संघर्ष भाजपचे उमेदवार नीलरतन आणि सपचे सुरेंद्र पटेल यांच्यातच होणार असल्याचे मानले जातेय. 3,45,294 मतदार असलेल्या या मतदारसंघात पटेल, ब्राह्मण, भूमिहार, यादव समुदाय निर्णायक भूमिकेत आहे. याचबरोबर ओबीसी, अनुसूचित जातीचे मतदार देखील लक्षणीय आहेत.
वाराणसी उत्तर
वाराणसीतील शहर उत्तर मतदारसंघात 2012 पासून भाजपचे रवींद्र जायसवाल आमदार आहेत. यंदा 10 उमेदवार उभे असले तरीही जायसवाल यांना तगडे आव्हान देताना कुणीच दिसून आलेला नाही. सपचे अशफाक अहमद डब्ल्यू जोरदार जनसंपर्क करू पाहत असले तरीही त्यांना स्वकीयांकडूनच दगाफटका होण्याची भीती आहे. माजी आमदार अब्दुल समद अंसारी यांना समाजवादी पक्षाने उमेदवारी नाकारली होती. 4,26,787 मतदार असलेल्या या मतदारसंघात वैश्य, क्षत्रिय आणि कायस्थ मतदार निर्णायक भूमिकेत आहेत.
कँट मतदारसंघ
भाजपच्या एका परिवाराचा वाराणसीच्या कँट मतदारसंघावर 1991 पासून कब्जा आहे. ज्योत्स्ना श्रीवास्तव आणि त्यांचे पती हरिश्चंद्र श्रीवास्तव यांच्यानंतर 2017 मध्ये त्यांचे पुत्र सौरभ येथील आमदार झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत येथे 9 उमेदवार उभे आहेत. 4,58,925 मतदार असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे माजी खासदार डॉ. राजेश मिश्र यांनी आव्हान उभे केले आहे. पूजा यादव समाजवादी पक्षाकडून पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. या ठिकाणी ब्राह्मण, कायस्थ, बंगाली, भूमिहार, मुस्लीम आणि वैश्य मतदार निर्णायक भूमिकेत आहेत.
रोहनिया मतदारसंघ
2012 मध्ये अस्तित्वात असलेल्या रोहनिया मतदारसंघाच्या पहिल्या आमदार विद्यमान केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल होत्या. 2014 च्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाने विजय मिळविला. तर 2017 च्या निवडणुकीत भाजपने येथे यश मिळविले. भाजपने यंदा हा मतदारसंघ अपना दल (एस)ला दिला आहे. येथे चारही प्रमुख पक्षांनी पटेल समुदायाचे उमेदवार उभे केले आहेत. मुख्य लढत अपना दल (एस) आणि अपना दल (के) यांच्यातच होणार असल्याचे मानले जातेय. येथे 4,07,917 मतदार असून सर्वाधिक पटेल समुदायाचे मतदार आहेत. याचबरोबर भूमिहार, यादव, ब्राह्मण, दलित, क्षत्रिय आणि ओबीसींचे मतदार लक्षणीय संख्येत आहेत.
अजगरा मतदारसंघ
2012 मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात बसपचे टी. राम हे पहिले आमदार म्हणून निवडून आले होते. 2017 च्या निवडणुकीत भाजप-सुभासप आघाडीचे उमेदवार कैलासनाथ सोनकर यांच्याकडून टी. राम यांना पराभूत व्हावे लागले होते. परंतु टी. राम यावेळी भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. तर सप-सुभासप आघाडीने सुनील कुमार सोनकर यांना उमेदवारी दिली आहे. 3,72,512 मतदार असलेल्या या मतदारसंघात मुख्य लढत भाजप आणि सप-सुभासप आघाडीमध्येच होणार आहे. येथे दलित मतदारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याचबरोबर ब्राह्मण, पटेल, राजभर, मौर्य, मुस्लीम, क्षत्रिय, भूमिहार आणि कायस्थ मतदार निर्णायक भूमिकेत आहेत.
शिवपूर मतदारसंघ
परिसीमनानंतर 2012 मध्ये शिवपूर मतदारसंघ अस्तित्वात आला. येथील पहिली निवडणूक बसपने जिंकली होती. तर 2017 मध्ये भाजपचे अनिल राजभर विजयी झाले. राजभर यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. यंदा येथील मुख्य लढाई अनिल राजभर आणि सप-सुभासपचे उमेदवार डॉ. अरविंद राजभर यांच्यात होणार आहे. अरविंद हे सुभासप अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांचे पुत्र आहेत. 3,73,296 मतदार असलेल्या या ठिकाणी यादव, राजभर, पटेल, दलित आणि मुस्लीम मतदार निर्णायक भूमिकेत आहेत.